पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/३१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



१४.
शास्त्री पंडित
 



 बहामनी कालातील महाराष्ट्राचे दुसरे नेते म्हणजे शास्त्री पंडित हे होत. मराठा सरदारांच्या नंतर त्यांच्या नेतृत्वाचे स्वरूप आता पाहावयाचे आहे.

जड हिंदुधर्म शास्त्र
 या काळात महाराष्ट्रात दलपती, अनंतदेव, नीळकंठ भट्ट, कमलाकर भट्ट असे मोठे पंडित होऊन गेले; पण मागे 'सातवाहन ते यादव' या कालखंडाचा विचार करताना सांगितल्याप्रमाणे, या काळात अखिल भारताचे धर्मशास्त्र सामान्यतः एकच होते. प्रांताप्रांतात मुळीच फरक नव्हता असे नाही. पण हा फरक गौण विषयांत असे. चातुर्वर्ण्य, जातिभेद, अस्पृश्यता, स्त्रीचे समाजातील स्थान, शब्दप्रामाण्य, निवृत्ती, सोवळे-ओवळे, कर्मकांड, अदृष्टप्रधानता इ. विषयांत भारतातील मिथिला, प्रयाग, काशी, पैठण, इ. धर्मक्षेत्रांतील पंडितांचे धर्मशास्त्र बव्हंशी एकरूपच होते. या पंडितांनी अकराव्या बाराव्या शतकात, हिंदुधर्मशास्त्राला जे रूप दिले त्यात बहामनी कालात फारसा बदल झाला नव्हता. त्यामुळे या काळातील धार्मिक क्षेत्रातील नेतृत्वाचा विचार करताना महाराष्ट्रातील आधीच्या एकदोन शतकांतील धर्मवेत्यांच्या मतांचा आधार घेणे आणि मिथिला, काशी, प्रयाग येथल्या शास्त्री पंडितांच्या ग्रंथांचा निर्देश करणे यात असयुक्तिक असे काहीच नाही. हा सर्व हिशेब पाहून विज्ञानेश्वर, अपरार्क, हेमाद्री, नीळकंठ भट्ट, कमलाकर भट्ट, रघुनंदन, शूलपाणी, इ. धर्मशास्त्रज्ञांच्या ग्रंथांच्या आधारे येथे बहामनी कालातील महाराष्ट्राच्या धार्मिक नेतृत्वाचा विचार केला आहे.