पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/३१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
२८८
 

संपत्ती ऊर्फ अन्न इतके मुबलक आहे की येईल त्याला तेथे राहण्यास यथेच्छ वाव आहे (कोकणात असे काही नाही हे राजवाड्यांखेरीज सर्वांना माहीत आहे).

अखिल भरतखंड !
 प्रारंभी राजवाडे यांनी ही मीमांसा फक्त उत्तर कोकणापुरतीच केली. पण पुढे त्यांनी सर्व हिंदुस्थानचीच ही स्थिती आहे, असा भरघोस सिद्धान्त मांडला. ते म्हणतात, मुबलक अन्न व यथेच्छ जागा असल्यामुळे कोकणात जीवनार्थ कलह, युरोपातील किंवा मध्य आशियातील भुके कंगाल देशातल्याप्रमाणे, जाज्वल्य नाही. पण संपन्नतेने आपला वरदहस्त एकट्या कोकणावरच ठेविला आहे, असे समजू नये. भरतखंड म्हणून ज्या खंडाला म्हणतात त्या बहुतेक सर्व खंडावर अन्नपूर्णची अशीच पूर्ण कृपादृष्टी आहे. या कृपादृष्टीचा परिणाम होऊन येथील लोक राजकारणपराङ्मुख, राष्ट्रपराङ्मुख, समाजपराङ्मुख, मुक्तद्वारी, तुटक, संन्यस्त व व्यक्तिंतंत्र झाले आहेत. येथे बाहेरच्या देशातून नवीन आक्रमक येतात, त्यांना पहिली काही वर्षे राज्य, साम्राज्य, समाजसंघटना, विद्या, कला, शास्त्रे यांच्याविषयी उत्साह वाटतो. पण येथे काही पिढ्या राहिल्यावर अन्नाचे वैपुल्य व सौलभ्य यामुळे त्यांचा तो उत्साह मावळतो व या सर्व खटाटोपाविषयी ते उदासीन होतात. त्यांना मरगळ येते.
 राधामाधवविलासचंपूच्या प्रस्तावनेत महाराष्ट्रातल्या मूळच्या मराठ्यांना राजवाडे यांनी नाकर्ते ठरविले आणि शूद्रसंकर हे त्याचे कारण दिले. आता या विवेचनात त्यांनी अखिल भारतीयांनाच नालायक, नाकर्ते, राष्ट्रशून्य, विद्याशून्य ठरवून, अन्नधान्याची समृद्धी हे त्याचे कारण दिले आहे आणि मौजेची गोष्ट अशी की पहिली वांशिक उपपत्ती, या विवेचनात त्यांनी कसलीही कारणे न देता, रद्द ठरविली आहे.

अर्थशून्य
 वांशिक उपपत्तीप्रमाणेच, ही आर्थिक उपपत्तीही अर्थशून्य, निराधार व कमालीची तर्कदुष्ट आहे, हे वरवर पाहताही, दिसून येईल. महाराष्ट्रापुरतेच बोलावयाचे तर येथे इ. पू. ३५० पासून सतत अखंड १५०० वर्षे कर्तृत्वाला खंड पडला नव्हता, आणि या काळात कोकणाप्रमाणे दर वेळी बाहेरचे आक्रमक येऊन त्यांनी पराक्रम केला, असे नाही. येथे जे शेकडो वर्षे चिरस्थायी झाले होते तेच कधी उदयाला येत होते, कधी ऱ्हास पावत होते. राजवाडे यांच्या मते इ. स. १६०० च्या आधी हजार दीड हजार वर्षे तरी भोसल्यांचे घराणे महाराष्ट्रात आले होते. तरी इतक्या वर्षात येथल्या अन्न- वैपुल्यामुळे त्यांना मरगळ आली नाही. तुलनेने पाहता, कर्नाटकात अन्नवैपुल्य जास्त. त्यांना जास्त मरगळ यावी. पण मुस्लिम आक्रमणाचा त्यांनी तत्काळ निःपात केला आणि त्या मानाने दरिद्री असणाऱ्या महाराष्ट्राला तीनशे वर्षे लागली. पण राजवाड्यांच्या या (किंवा इतर कोणत्याही ) उपपत्तीची चर्चा करीत बसण्यात अर्थ नाही. अन्न-