पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/३१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२८५
मराठा सरदार
 

निघाला. पण याविषयी राजवाडे यांनी एकदोन निराळ्या उपपत्ती मांडल्या आहेत. त्यांचा परामर्श घेऊन हे प्रकरण संपवू.

राजवाडे - उपपत्ती
 मराठ्यांच्या कर्तृत्वहीनतेची भीमांसा करताना राजवाडे यांनी दोन उपपत्ती मांडल्या आहेत. एक वांशिक व दुसरी आर्थिक. 'राधामाधवविलासचंपू'च्या प्रस्तावनेत, त्यांनी वांशिक उपपत्ती मांडली आहे. आणि 'महिकावतीची बखर , या ग्रंथाच्या प्रस्तावनेत आर्थिक उपपत्ती मांडली आहे. येथे क्रमाने त्यांचा विचार करू.

नाग महाराष्ट्रोत्पन्न
 राजवाडे यांच्या मते, महाराष्ट्रातले मराठे हे अस्सल क्षत्रिय नव्हेतच. महाराष्ट्रावर चालुक्य, राष्ट्रकूट, यादव, वा मराठा घराण्यांनी राज्ये केली. पण, राजवाडे यांच्या मते, ही घराणी उत्तर हिंदुस्थानातून आलेली अतएव परकी होत. ही घराणी अस्सल क्षत्रिय होती. पण महाराष्ट्रातले मराठे ते हे नव्हेत. ते मूळचे मराठे इ. स. पूर्व सहाव्या शतकात मगध, कुरू, पांचाल इ. प्रदेशांतून दक्षिणेत आले होते. ते क्षत्रिय होते. पण रामकृष्णांचे वंशज नव्हते. अस्सल क्षत्रियांना शूद्र भार्यापासून झालेली ती संतती होती. त्या काळी अनुलोम विवाह शास्त्रसंमत होते. त्यामुळे क्षत्रियांच्या शुद्र भार्याच्या संततीलाही क्षत्रियच म्हणत. महाराष्ट्रातले बहुसंख्य मराठे असे क्षत्रिय होते. शिवाय उत्तरेतून महाराष्ट्रात आल्यावर, त्यांनी येथील नागलोकांशी सोयरिकी केल्या. त्यामुळे त्यांच्या रक्ताचा अस्सलपणा आणखी कमी झाला. आणि या संकरामुळे या मराठ्यांच्या अंगी कर्तृत्व निर्माण होऊ शकले नाही. यांना राजवाडे नागमहाराष्ट्रिकोत्पन्न मराठे असे म्हणतात. (चालुक्य, राष्ट्रकूट, यादव हे जे अस्सल क्षत्रिय ते महाराष्ट्र क्षत्रिय. आणि मराठे हे नागमहाराष्ट्रोत्पन्न.) या लोकांनी महाराष्ट्रात वसाहती केल्या. पण त्यांनी राज्ये किंवा साम्राज्ये स्थापन केली नाहीत. कारण त्यांच्या ठायी ती ऐपतच नव्हती. पाटिलकी, देशमुखी, सरदेशमुखी मिळवावी व सांभाळावी यापलीकडे जाण्याचे बुद्धीचे व मनाचे सामर्थ्य त्यांच्या ठायी नव्हते. स्वत्त्व नाही, धर्म नाही, ऐतिह्य नाही, कला नाही, विद्या नाही, शास्त्र नाही, त्यांचे महत्त्व जाणण्याची ऐपत नाही अशी त्यांची स्थिती होती. इ. स. पूर्व तिसऱ्या शतकापासून इ. स. तेराव्या शतकाच्या अखेरपर्यंत सातवाहन, वाकाटक, बदामीचे चालुक्य, राष्ट्रकूट, कल्याणीचे चालुक्य व यादव यांनी महाराष्ट्रावर राज्य केले. त्यांनी साम्राज्ये विस्तारली. पण यांना सर्वांना राजवाडे परके म्हणतात. म्हणून या काळात महाराष्ट्रिकोत्पन्न मराठे पारतंत्र्यातच रखडत होते असे म्हणावे लागते. बहामनी काळात पारतंत्र्य होते हे उघडच आहे. शहाजी राजे व शिवछत्रपती यांनी बहामनी सत्ता नष्ट करून स्वराज्य स्थापिले. तेथपर्यंत म्हणजे १६०० वर्षे, राजवाडयांच्या मते, मराठे हे पारतंत्र्यातच होते. भोसल्यांच्या राज्यापासून त्यांचे