पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/२५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
२२६
 

 महाराष्ट्री आणि अपभ्रंश ही मराठीची दोन पूर्वरूपे. त्यांतील साहित्याचा परिचय येथवर करून घेतला. आता खुद्द मराठीकडे वळावयाचे. यादवकालाअखेर मराठीत मुकुंदराजाचा 'विवेकसिंधू', महानुभावांचे काही ग्रंथ आणि 'ज्ञानेश्वरी' व 'अमृतानुभव' असे ग्रंथ झाले. त्यांतील ज्ञानेश्वरीचा परिचय एकंदर संतवाङ्मयाच्या विवेचनात येईल. येथे प्रथम विवेकसिंधू आणि नंतर महानुभावांचे वाङ्मय यांचा विचार करू.

विवेकसिंधू
 मुकुंदराजाचा 'विवेकसिंधू' हा ग्रंथ इ. स. ११८८ साली लिहिलेला आहे. त्यानंतर पुढल्याच वर्षी यादवांच्या राज्याची स्थापना झाली. शारंगधर नामक कोणा राजाच्या कारकीर्दीत नृसिंहाचा पुत्र बल्लाळ याचा पुत्र जयंतपाळ याच्या प्रेरणेने हा ग्रंथ रचला अशी माहिती स्वतः मुकुंदराजाने ग्रंथाच्या शेवटी दिली आहे. शारंगधर राजा कोण, कोठला हे अजून निश्चित झालेले नाही. आपल्या आजेगुरूसंबंधी लिहिताना 'वैन्यगंगेच्या तीरी मनोहर अंबा नगरी'चा उल्लेख मुकुंदराजाने केला आहे. नागपूर प्रांतात भंडाऱ्याजवळचे अंभोर म्हणजेच वाइनगंगेच्या काठची अंबानगरी होय. यावरून मुकुंदराज नागपूर प्रांतातला असावा असे दिसते. पण त्याची एक समाधी जोगाई अंग्याजवळही आहे. त्यामुळे त्याचे स्थान निश्चित करता येत नाही.
 मुकुंदराजाने श्री शंकराचार्यांचे अद्वैत तत्त्वज्ञानच 'विवेकसिंधू' या ग्रंथात मराठीत सागितलेले आहे. 'श्री शांकरोक्तिवरी । मी बोलिलो मराठी वैखरी । म्हणूनी येथे धरावी चतुरी | शास्त्रबुद्धी ।' असे त्यानेच म्हटले आहे. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी विवेकसिंधूबद्दल लिहिताना म्हणतात, 'मराठीत मायावादी अद्वैत सिद्धान्ताची विवेचनात्मक मांडणी करणारा विवेकसिंधू हा पहिला ग्रंथ होय. वेदान्त सिद्धान्ताची समग्र, क्रमबद्ध व प्रकरणवारीने मांडणी करणारा याच्या तोडीचा दुसरा ओवीबद्ध ग्रंथ मराठीत नाही.' विवेकसिंधूची १८ प्रकरणे व ओवीसंख्या सुमारे १७०० असून हा ग्रंथ गुरुशिष्यसंवादरूपाने लिहिलेला आहे.
 मराठीत पहिला ग्रंथ झाला तोच इतका विद्वन्मान्य असावा, हे मराठीला भूषणावह आहे. याच्या आधीचे वाङ्मय काही तरी असलेच पाहिजे; पण ते सध्या उपलब्ध नाही. म्हैसूरजवळील श्रवणबेलगोला येथे गौतमेश्वराचा शिलालेख - श्री चामुंडराये करवियले-, सोमेश्वराच्या मानसोल्लासातील काही गीते अशा तऱ्हेचे लेखनच फक्त उपलब्ध आहे. तेव्हा मराठीतला विवेकसिंधू हा पहिला ग्रंथ होय. आणि वर सांगितल्याप्रमाणे तो मराठीला भूषणभूत झालेला आहे.

महानुभाव
 मुकुंदराजानंतर यादवकाळातील महत्त्वाचे मराठी साहित्य म्हणजे महानुभाव पंथाचे. याचे संस्थापक श्री चक्रधरस्वामी हे मूळचे एक गुजराथचे राजपुत्र. त्या