पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/२४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
२२२
 



गौरव
 गाथासप्तशती हा काव्यकोश असा काव्यसौंदर्याने नटलेला असल्यामुळे प्राचीन काळच्या पंडितांनी सुद्धा त्याचा मुक्तकंठाने गौरव केला आहे. बाणभट्ट म्हणतो, 'एखाद्या राजाने उत्तम रत्नांचा संग्रह करावा तसा सातवाहन राजाने हा सुभाषितांचा कोश रचला आहे.' उद्योतन सूरी याने आपल्या कुवलयमाला या ग्रंथात ( इ. स. ७७८ ) म्हटले आहे की 'राजसभेतील कवींच्या सहकार्याने हाल राजाने असा अक्षय्य कोश रचला की निरंतर उपयोगाने सुद्धा त्याचे सौंदर्य लोपले नाही.' प्रसिद्ध कवी राजशेखर यानेही सप्तशतीचा असाच गौरव केला आहे. 'सातवाहन राजाने अनेक ठिकाणांहून गाथा जमवून त्यांचा संग्रह केला, त्यामुळे लोकांचा आनंद संकोच तर नाहीच पावला, उलट तो द्विगुणित झाला.'
 संस्कृत साहित्यशास्त्रावर अनेक पंडितांनी ग्रंथ रचलेले आहेत. त्यांतील आनंदवर्धन, धनंजय, मम्मट, विश्वनाथ यांसारख्या मोठमोठ्या ग्रंथकारांनी सुद्धा सप्तशतीतील अलंकारांची उदाहरणे दिली आहेत. यावरून हे अलंकार किती मान्यता पावले होते हे ध्यानात येईल. निरनिराळ्या बारा साहित्यशास्त्रज्ञांनी तरी अशी गाथांची उदाहरणे आपल्या ग्रंथांत दिली आहेत.

हरिविजय
 वाकाटक राजे संस्कृतप्रमाणेच प्राकृताचेही अभिमानी होते आणि त्यांतील सर्वसेन आणि द्वितीय प्रवरसेन यांनी स्वतः 'हरिविजय' आणि सेतुबंध' ही महाराष्ट्री प्राकृतात काव्येही रचली आहेत. 'हरिविजय' हे काव्य सध्या उपलब्ध नाही. पण दण्डी, आनंदवर्धन, अभिनवगुप्त यांनी त्याचे उल्लेख करून प्रशंसाही केली आहे. अभिनवगुप्ताच्या उल्लेखावरून 'पारिजातहरणा'चा प्रसंग या काव्याचा विषय आहे असे दिसते. स्वर्गातून सत्यभामेसाठी श्रीकृष्णाने पारिजात वृक्ष आणला ही ती पारिजातहरण कथा होय. आनंदवर्धनाने ध्वनिकाव्याचे उदाहरण म्हणून हरिविजयातील एक गाथा दिली आहे. आणि कुंतकाने, 'सर्वसेनाचे काव्य सौकुमार्यामुळे सुंदर झाले आहे,' असे म्हटले आहे. सर्वसेनाने काही प्राकृत सुभाषितेही रचली आहेत व त्यांतील काहींचा सध्याच्या गाथासप्तशतीत समावेशही झालेला आहे. आपल्या प्राचीन ग्रंथांत मागून लोक वाटेल तशी भर टाकीत असत हे प्रसिद्धच आहे. त्यातलाच हा प्रकार असावा.
 सर्वसेन व त्याचे वंशज यांच्या राजवटीत वत्सगुल्म हे विद्येचे केंद्र बनले होते. तेथे रचलेली काव्ये व सुभाषिते यांच्या योगे वच्छोमी (वत्सगुल्मी) नामक नवीन, वैदर्भी रीतीसारखी रीतीही प्रचारात आली होती, असे राजशेखराने कर्पूरमंजरीत केलेल्या उल्लेखावरून दिसते.