पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/२५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२२३
साहित्य, कला व विद्या
 



सेतुबंध
 दुसरे महाकाव्य म्हणजे प्रवरसेनाचे 'सेतुबंध' हे होय. हे महाकाव्याला उचित अशा विदग्ध शैलीत रचलेले आहे. बाणभट्टाने याचा गौरव करताना म्हटले आहे की 'ज्याप्रमाणे रामचंद्राची वानरसेना सेतूच्या योगे समुद्रपार करून गेली, त्याप्रमाणे प्रवरसेनाची कीर्ती 'सेतुबंध' या काव्यसेतूच्या योगाने समुद्रपार गेली.' आनंदवर्धनानेही या काव्याची मनसोक्त स्तुती केली आहे. कवी दण्डीचा श्लोक पहिल्या प्रकरणात दिलाच आहे. 'महाराष्ट्र भाषा ही सर्वश्रेष्ठ प्राकृत भाषा का ? तर तिच्यात सेतुबंधासारखे सूक्तिरत्नांचे सागर आहेत म्हणून.'

कर्पूरमंजरी
 राजशेखर हा कवी, नाटककार व साहित्यमीमांसकही होता. तो नवव्या शतकाच्या अखेरीस होऊन गेला. त्याचे 'कर्पूरमंजरी' हे नाटक महाराष्ट्री प्राकृतात आहे. तो स्वतःला 'महाराष्ट्रकुलचूडामणी' असे म्हणवितो. कर्पूरमंजरी हे चार अंकी नाटक असून कुंतल राजकन्या कर्पूरमंजरी आणि राजा चंद्रपाल यांची प्रणयकथा यात वर्णिली आहे कर्पूरमंजरीच्या विरहाचे वर्णन एका श्लोकात कवीने जुन्या संस्कृत परंपरेप्रमाणेच केले आहे. हार गळ्यात टोचू लागले, चंद्र ताप देऊन लागला, गार वारा देह जाळू लागला, असे हे वर्णन आहे.

जैन साहित्य
 जैनांनी महाराष्ट्री प्राकृतात विपुल साहित्य लिहिले आहे. त्यात प्रामुख्याने कथा आणि चरित्रे आहेत.
  'वामुदेव दिंडी' हा ग्रंथ कथासाहित्यात प्राचीनतम गणला जातो. त्यात कृष्णाचा पिता वसुदेव याच्या दिंडीचा म्हणजे भ्रमणाचा वृत्तांत दिला आहे. या ग्रंथात हरिवंशाची प्रशंसा केलेली आहे. 'वासुदेव दिंडी'चे दोन खंड आहेत. दोन्ही मिळून २८००० श्लोक आहेत. संघदास गणि व धर्मसेन गणि या खंडांचे कर्ते आहेत. 'समराहिच्चकथा' या ग्रंथात उज्जैनचा राजा समरादित्य याची कथा आहे. हरिभद्र सूरी हा याचा कर्ता. त्याने हा ग्रंथ आठव्या शतकात रचला. यात नायक नायिकांच्या प्रेमाचे वर्णन प्रधानतः असून इतरही अनेक कथांची गुंफण केलेली आहे. 'कुवलयमाला' ग्रंथ उद्योतनसूरी याने सन ७७६ मध्ये रचला. काव्यशैलीत लिहिलेला हा ग्रंथ प्राकृत कथा-साहित्यात अनुपम गणला जातो. ग्रंथावरून कर्त्याची विद्वत्ता व निरीक्षणशक्ती यांचा प्रत्यय येतो. बनारस, पैठण इ. अनेक नगरींची वर्णने यात आहेत. 'भुवन सुंदरी' ही कथा समुद्रसूरी याने सन ९१७ मध्ये लिहिली आहे.