पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/२३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
२१०
 


व्यापार
 हिंदुस्थान देश मागल्या काळी जसा धर्मासाठी तसाच किंवा त्याहूनही जास्त व्यापारासाठी प्रसिद्ध होता. अंतर्गत आणि बाह्य देशांशी चालणारा व्यापार फार मोठ्या प्रमाणावर चालत असे. उत्तरपथ व दक्षिणापथ यांना जोडणारे व्यापारी मार्ग सर्वत्र पसरले होते. भारताच्या पूर्व व पश्चिम भागांचा एकमेकांशी फार मोठा व्यापार सातवाहन काळात चालत असे. अपण्णक जातकात एका मोठ्या सार्थवाहाचे वर्णन आहे. सार्थवाह म्हणजे व्यापारी तांड्याचा नायक. हा सार्थवाह पाचशे गाडे घेऊन पूर्वेकडून पश्चिमेकडे व पश्चिमेकडून पूर्वेकडे असा सारखा हिंडत असतो. कऱ्हाड, जुन्नर, नाशिक, पैठण, भोगवर्धन, चौल, सोपारा, कल्याण, वैजयंती ही सातवाहन कालातली व्यापारी नगरे होत. ती नगरे सार्थवाहपथांनी एकमेकांशी जोडली गेली होती. पैठण, तेर (नगर) यांना उज्जयिनीशी जोडणारा रस्ता अजिंठ्याच्या घाटातून गेला होता. गोवर्धन व नाशिक ही ठाणी नाणे घाटाने जुन्नरशी व कोकण घाटाने कार्ल्याशी जोडणारा सार्थवाहपथ नाशिकच्या लेण्यावरून जात होता.
 या नगरींचा विशेष हा की या सर्व ठिकाणी बौद्धांची व इतर कोरीव लेणी आहेत. आणि त्या सर्वांना या सार्थवाहांनी उदार देणग्या दिलेल्या शिलालेखांत नमूद केलेल्या आहेत. असा या लेण्यांचा व्यापाराशी दूरान्वयाने संबंध आहे. वैजयंतीचा श्रेष्ठी भूतपाल याने दिलेल्या दानातून कार्ल्याचा चैत्य कोरवला गेला. तेथील शैलगृह सर्वांत सुंदर शैलगृह असल्याचा अभिमान भूतपालाने शिलालेखात व्यक्त केला आहे.

परदेशी व्यापार
 हे अंतर्गत व्यापाराविषयी झाले. त्या काळी परकी देशांशी चालणाऱ्या व्यापाराचे प्रमाण असेच मोठे होते. इ. पू. सहाव्या शतकात कोकणातील सोपाऱ्याहून बाबिलोनशी व्यापार चालू होता है बौद्ध वाङ्मयावरून समजते. रोम, कार्थेज व इजिप्त या देशांशी सातवाहन काली मोठा व्यापार चालू होता. भडोच, सोपारा, कल्याण, चौल, जयगड, दाभोळ, बाणकोट, राजापूर ही बंदरे त्या वेळी यासाठी प्रसिद्ध होती.

व्यापारी माल
 हस्तिदंत, शंख, शिंपले, मोती, रंग, लोखंड, लाकूड आणि सुती व मलमली कापड हा माल प. भारतातून जागतिक बाजारपेठेत जात असे. रोममधून आलेल्या मालात कलाकुसर असलेली खापरे, चंबू, खुजा, सुरई, मद्यकुंभ अशा तऱ्हेचा माल उत्खननात सापडतो. परदेशांहून भारतात आलेल्या व्यापाऱ्यांनीही लेण्यांना दाने दिलेली आहेत. धेनुकाकट येथील यवन व्यापाऱ्यांनी कार्ले, पितळखोरे येथील बौद्धसंघांना दिलेल्या दानांचा उल्लेख आहे.