पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/२३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२०५
समाजरचना
 

 पण अनेक शास्त्रकारांना पतीच्या मागे स्त्रीने जिवंत रहावे हेच मान्य नाही. तिने सती जावे हाच तिचा श्रेष्ठ धर्म होय असे त्यांचे मत आहे. महाभारत, रामायण या ग्रंथांत सतीची उदाहरणे सापडतात. पण इतिहासकाराच्या मते ती अपवादात्मक होत. पुढल्या काळात मात्र काही स्मृतिकार या चालीचा आग्रहाने पुरस्कार करू लागले. बृहस्पतीने विकल्पाने सहगमन सांगितले आहे. पण शंख, अंगिरस व हारीत यांचा, सती गेलेच पाहिजे, हा दण्डक आहे. तरी त्याच काळात या चालीचा निषेध करणारे शास्त्रकारही होते. त्यामुळे गुप्त काळाच्या अखेरीपर्यंत तिचा फार जोर नसावा असे तज्ज्ञांचे मत आहे. पुढच्या काळात या सहगमनाचा आग्रह फार होऊ लागला आणि त्याला कित्येक ठिकाणी सक्तीचे स्वरूप येऊ लागले.

व्यक्ती आणि समाज
 यानंतर व्यक्ती आणि समाज यांच्या संबंधांचा विचार करावयाचा. पण तो 'धार्मिक जीवन' या प्रकरणात येऊन गेला आहे. शब्दप्रामाण्य, जातिबंधने, कार्य- कारणावाचून केलेल्या आज्ञा या व्यक्तीचे व्यक्तित्व नष्ट करतात. सातव्या आठव्या शतकापर्यंत शास्त्रात जरी अशी बंधने असली तरी प्रत्यक्षात व्यक्तीला पुष्कळच स्वातंत्र्य होते. बुद्धिस्वातंत्र्याच्या संबंधीचे अनेक उद्गार तेथे दिले आहेत. आणि वर जे जातींचे संकर, रक्तसंकर, व्यवसाय संकर यांविषयी विवेचन केले आहे त्यावरून सर्व क्षेत्रांत व्यक्तीला विपुल स्वातंत्र्य होते असे दिसते. त्या काळच्या विद्यापीठांतून सर्व वर्णाच्या विद्यार्थ्यांना सर्व विषयाचे, वेदांचे सुद्धा, शिक्षण मिळत असे. यावरूनही जातिबंधने व्यक्तिस्वातंत्र्य नष्ट करीत असे दिसत नाही. पण पुढच्या काळात व्यक्तीवरची बंधने वाढत गेली आणि तिचे कर्तृत्व हळूहळू लोप पावू लागले. अकराव्या बाराव्या शतकात ते पूर्णपणे लुप्त झाले आणि भारताचा अधःपात झाला.
 या एकंदर विवेचनावरून, समता, सहजीवन, व्यक्तिस्वातंत्र्य, बुद्धिप्रामाण्य या तत्त्वांवर समाजरचना उभी असते तेव्हा समाजाचा उत्कर्ष होतो, या तत्त्वांची गळचेपी झाली की त्याचा नाश होतो, असे दिसून येईल. सातवाहन ते यादव या काळात प्रारंभी त्या उच्च तत्त्वांचा पुष्कळच आदर केला जात असे. पुढे शास्त्रकार त्यांचा अनादर करू लागले. त्यामुळेच हा देश, त्याची जीवशक्ती क्षीण होऊन, परकीय आक्रमणास बळी पडला व त्याचे सर्व क्षेत्रांतले प्राचीन वैभव नष्ट झाले.