पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/२२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
२०२
 

सातवाहन सम्राट सातकर्णी १ला (इ. स. पूर्व १९४ - १८५ ) याची राणी नागनिका ही मोठी कर्तबगार स्त्री होती. महारथी अणकथिगे याची ही कन्या. सातकर्णी निधन पावला त्या वेळी वेदश्री, सतिश्री ही त्याची मुले लहान होती. त्या वेळी अनेक वर्षे नागनिकेने संन्यस्त वृत्तीने राहून साम्राज्याचा कारभार पाहिला. नाणे घाटातील सातवाहन कुळातील स्त्रीपुरुषांचे पुतळे व लेख तिनेच कोरविले आहेत. सातवाहनांचा अत्यंत विख्यात सम्राट गौतमीपुत्र सातकर्णी (इ. स. ७२- ९५ ) याची माता बलश्री ही अशीच असामान्य स्त्री होती. या सातकर्णीने शकांच्या दास्यातून महाराष्ट्राला मुक्त केले. त्याचे श्रेय विद्वानांच्या मते त्याच्या मातेलाच आहे. यामुळे म. म. मिराशी यांनी गौतमी बलश्री व सातकर्णी यांची तुलना जिजामाता व शिवछत्रपती यांशी केली आहे ( संशोधनमुक्तावली, सर २, १६७ - १७८ ). नाशिकच्या सातवाहन लेण्यात आपल्या पुत्राच्या गौरवाचा लेख हिनेच कोरविला आहे. महाराष्ट्राच्या इतिहासातील तिसरी विख्यात राणी म्हणजे वाकाटक नृपती द्वितीय रुद्रसेन याची अग्रमहिषी प्रभावती गुप्ता ही होय. गुप्त सम्राट चंद्रगुप्त याची ही कन्या. पतीच्या मागे पुत्र लहान असल्यामुळे हिने १२ वर्षे राज्यकारभार पाहिला. हिने दिलेल्या दोन ताम्रपटांवर हिची सर्व माहिती आज उपलब्ध झाली आहे. हिच्या साह्यार्थ हिचा पिता चंद्रगुप्त याने आपल्या दरबारातील अधिकारी व मुत्सद्दी पाठविले होते. त्यातच कविकुलगुरू कालिदास हाही होता असा विद्वानांचा तर्क आहे. पुढील काळातही राजप्रतिनिधी म्हणून किंवा राज्यपाल म्हणून शासन करणाऱ्या अनेक स्त्रिया होऊन गेल्या. बदामी चालुक्यराज विक्रमादित्य याच्या भावाची स्त्री विजयभट्टारिका ही राज्यपाल होती. कल्याणी चालुक्यराज सोमेश्वर ( इ. स. १०५३) याची राणी मेलादेवी ही वनवासी प्रांताची राज्यपाल होती. त्याची दुसरी राणी केतलादेवी ही पोन्नवदची राज्यपाल होती. जयसिंहाची बहीण अक्कादेवी ही हानगलच्या कदंब घराण्यात दिली असून जयसिंहाच्या कारकीर्दीत किसुकाड, तोरगरे, मासवाडी या विभागांचा कारभार पाहात असे. तिला तिच्या गुणांवरून 'गुणाड वेदांगी ' ( सद्गुणमूर्ती) व ' एकवचनी' अशा पदव्या मिळाल्या होत्या. तिला तिच्या शौर्यावरून रणभैरवीही म्हणत. काही काळ विजापूर जिल्ह्यातील विक्रमपूर ही तिची राजधानी होती. गोकाककडील बंड मोडण्यासाठी तिने इ. स. १०४७ मध्ये गोकाकला वेढा घातला होता (बांबे गॅझेटियर, जनरल चॅप्टरस्, ट. ४३५ ). विजयादित्याची थोरली बहीण कुंकुमदेवी परीगेरीचा कारभार पहात असे (इ. स. १०७७ ) सहावा विक्रमादित्य याची पट्टराणी लक्ष्मीदेवी एकंदर १८ अग्रहारांचा कारभार पहात असे ( इ. स. १०९५ ). ( डॉ. आळतेकर, राष्ट्रकूट, पृ. १५४ )
 इ. सनाच्या तेराव्या शतकानंतर नृत्य, गायन, चित्र या कला स्त्रियांना अगदी वर्ज्य मानल्या गेल्या. कुलहीन स्त्रियांचे ते काम होय, असे मत समाजात रूढ झाले. पण त्या पूर्वीच्या काळी राजघराण्यांतील स्त्रियाही या कलांचा मनोभावे अभ्यास करीत