पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/२१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१८९
समाजरचना
 


दोन प्रवाह
 या विषयाचा विचार करताना, दुसरी एक गोष्ट ध्यानात येते ती अशी की समतेचे व विषमतेचे अशी दोन तत्त्वज्ञाने, या दोन विचारांचे दोन प्रवाह फार प्राचीन काळापासून भारतात दिसून येतात. वेद, ब्राह्मणे, उपनिषदे, धर्मसूत्रे, स्मृतिग्रंथ या सर्व धर्मग्रंथांत प्रारंभापासून जन्मनिष्ठ वर्णभेदाचा व जातिभेदाचा पुरस्कार केलेला आढळतो आणि तितक्याच आग्रहाने गुणकर्मनिष्ठ चातुर्वर्ण्याचाही गौरव केलेला आढळतो. महाभारत या एकाच ग्रंथात अगदी दोन परस्परविरुद्ध अशी आत्यंतिक टोकाची मते सांगितलेली दिसतात. म्हणून अभ्यासकांना पुराणे व इतिहास यांच्या आधारे कोणत्या काळी काय स्थिती असावी याविषयी निर्णय करावा लागतो.

शास्त्र व व्यवहार
 त्या दृष्टीने पाहिले तर प्रारंभीच्या काळी समतेचे तत्त्व, तो विचारप्रवाह जोरकस होता असे दिसते आणि हळूहळू त्याचा जोर ओसरून इ. सनाच्या दहाव्या अकराव्या शतकात हिंदुसमाज अत्यंत विषम झाला व त्यामुळेच तो विघटित होऊन मुस्लिम आक्रमणाला बळी पडला. आज आपल्या समाजात आर्थिक, सामाजिक, धार्मिक, राजकीय सर्व प्रकारच्या समतेचा उद्घोष चालू आहे. तरी त्या मानाने प्रत्यक्षात त्याच्या शतांशही नाही. समाजवादी समाजरचनेच्या घोषणा तर प्रत्यही शतवार होत असतील. पण पुढील शंभर वर्षांत तरी तशी रचना अवतरेल की नाही याची सर्वांनाच, घोषणा करणाऱ्यांना सुद्धा, शंका आहे. अस्पृश्यतानिवारण, बालविवाहबंदी, हुंडाबंदी, दारूबंदी या सर्वांचे तेच आहे. हे ध्यानात घेऊन मागल्या काळचा विचार केला पाहिजे. धर्मशास्त्रात काहीही सांगितले असले तरी समाजाच्या व्यवहारात शास्त्र कितपत आचरिले जाते, हे पाहूनच निर्णय केला पाहिजे.

इतिहासपुराणाभ्यां वेदं समुपबृंहयेत् ।

असे शास्त्रवचनच आहे. प्रत्यक्ष वेदांना सुद्धा इतिहास-पुराणाच्या दृष्टीतून आपला अभ्यास व्हावा असे वाटत असे. आणि त्या दृष्टीने आपल्या समाजरचनेकडे पाहिले तर असे दिसून येते की वर्णाची व जातींची नियमने प्राचीन ग्रंथांत सांगितली होती तरी व्यवहार तसा काटेकोरीने होत नव्हता. इ. सनाच्या सातव्या आठव्या शतका पासून शास्त्रातही विषमता जास्त प्रतिपादिली जाऊ लागली आणि व्यवहारातही भेदाभेद फार रूढ होऊ लागले. त्यामुळे समाजाची एकरूपता बिघडली, भिन्न घटकांत जास्त दुरावा निर्माण झाला आणि समाजाची संघटना भंगून तो दुबळा व सामर्थ्यहीन झाला.