पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/२०३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
१७६
 

फिरलेल्या कोणी पंडितांनी पुराणात आपल्याला हवी ती भर घातली असे पाहिजे तर म्हणू. पण त्यांनी एकाच वैदिक पंथातील दोन देवतांच्या भक्तांत परस्पराविपयी अत्यंत असहिष्णू वृत्ती निर्माण केली.
 वराह, मत्स्य, वायू, भागवत, पद्म या पुराणांत शैव सिद्धान्तांची निरर्गल निंदा केली आहे. लोकांनी विष्णूखेरीज अन्य देवतांची उपासना करू नये, वैष्णवेतर लोकांना नमस्कारही करू नये, पशुपतीच्या स्मरणानेसुद्धा मनुष्य पतित होतो, असे काही पुराणे सांगू लागली. रामानुज हे वैष्णव होते ( इ. स. १०१६ ). एका चोळ राजाने त्यांचा अनन्वित छळ केला, कारण तो शैव होता. कुलत्तोग चोळ राजाने (इ. स. ११३०-५० ) शैवमताभिमानामुळे गोविंदाची मृत समुद्रात फेकून दिली होती. पूर्वीचा चोळराजा राजराज (इ. स. ९८५ - १०१५ ) याने शिव, विष्णू, जिन यांची मंदिरे स्वतः बांधली होती. पण ती सहिष्णुवृत्ती आता नष्ट झाली. आणि समाजाचा अधःपात झाला. (दि चोळाज्, प्रा. नीलकंठ शास्त्री, खंड २रा, भाग १ला, पृ. ४८८-९० ). कुलगुरू, चिंतामणराव वैद्य यांनी असेच मत दिले आहे. ते म्हणतात, 'या काळ- विभागात (इ. स. १००० - १२०० ) हिंदु धर्मात परस्परद्वेष करणारी भिन्न भिन्न मते प्रबळ झाली आणि मजबूत राष्ट्राचे जे एक मुख्य लक्षण धर्मैक्य ते नाश पावून हिंदुस्थान दुर्बळ झाले.' ( मध्ययुगीन भारत, भार ३ रा, पृ. ५८५ - ६२२ ).
 कुमारिलभट्टाची निबंधकारांनी स्वीकारलेली मीमांसापद्धती, आचार्यप्रणीत निवृत्तिवाद आणि पुराणांचा कर्मकांडात्मक विकृत धर्म यांनी दहाव्या अकराव्या शतकात हिंदुसमाजाच्या कर्तृत्वाचा ऱ्हास कसा झाला हे येथवर पाहिले. आता त्याच सुमारास निर्माण झालेले व हिंदुसमाजास अत्यंत घातक झालेले जे कलिवर्ज्य प्रकरण त्याचा विचार करून या प्रकरणाचा समारोप करू.

कलिवर्ज्य
 कलिवर्ज्य ही स्मृती नाही. तो एक निबंध आहे. अनेक श्रुतिस्मृतिपुराणवचने एकत्र करून रचलेले ते धर्मशास्त्र आहे. इ. स. १००० ते इ. स. १२०० या काळात त्याची रचना झाली असे विद्वद्-रत्न दप्तरी यांनी दाखवून दिले आहे. 'कलीच्या प्रारंभीच धर्मवेत्यांनी लोकरक्षणार्थ काही कृत्ये वर्ज्य ठरविली आहेत, आणि या साधु- सज्जनांनी निश्चित केलेल्या धर्माज्ञा असल्यामुळे त्या वेदाप्रमाणेच प्रमाण आहेत ' असे कलिवर्ज्यकार म्हणतो. या वाक्यावरून ही मोठी हितावह रूढी आहे, दर युगात धर्मवेत्यांनी परिस्थितीचा विचार करून लोकरक्षणासाठी धर्मनियम ठरवावे, हे मत या निबंधकाराला मान्य होते असे वाटेल. आणि तत्त्वतः तसा अर्थ आहेही. पण प्रत्यक्ष व्यवहारात या कलिवर्ज्य प्रकरणामुळे कोणते अनर्थ झाले ते पाहिले म्हणजे या भ्रमाचा निरास होईल.