पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/१५१

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
महाराष्ट्र संस्कृती
१२४
 

थोडा होतो. यामुळे अनियंत्रित राजसत्तेची मध्ययुगीन हिंदू राज्येसुद्धा व्यवस्थित चालून सुखी असत' (भाग ३ रा, प्र. ६५५ ).
 या काळात महाराष्ट्रात होऊन गेलेल्या भिन्न राजघराण्यांचा इतिहास पाहता, याच सिद्धान्ताला पुष्टी मिळते. यातील बहुतेक राजघराण्यांचे इतिहास आता शिलालेख, ताम्रपट, तत्कालीन साहित्य व परकी प्रवाशांचे वृत्तांत यांच्या आधारे बऱ्याच तपशिलासह उपलब्ध झाले आहेत. त्यावरून पाहता असे हे स्पष्ट दिसते की त्या राजघराण्यांत उन्मत्त, मदांध जुलमी असे राजे जवळ जवळ झालेच नाहीत.

सातवाहन
 या कालखंडात वर सांगितल्याप्रमाणे सहा राजवंशांनी राज्य केले. अगदी ढोबळ हिशेबाने पाहता एवढ्या काळात ५०-६० राज्यकर्ते पुरुष सत्तारूढ झाले होते. आणि उपलब्ध पुराव्यांवरून पाहता असे दिसते की यांतील बहुसंख्य राजे सुविद्य, सुसंस्कृत व सदभिरुचिसंपन्न असे होते. राजा कालस्य कारणम् । हे वचन परमार्थाने ज्या काळात सत्य होते त्या काळात असे सुसंस्कृत राजपुरूष सिंहासनारूढ झाले होते, एवढ्या एका गोष्टीवरूनसुद्धा त्या काळच्या महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचे रूप किती उज्ज्वल होते हे लक्षात येईल. सातवाहनांच्या राज्याविषयी लिहिताना डॉ. के. गोपालाचारी म्हणतात, " गौतमीपुत्र श्री सातकर्णी व पुलुमायी यांच्या व तत्कालीन बौद्धांच्या लेखांवरून सातवाहन साम्राज्याच्या इतिहासावर जो प्रकाश पडतो त्याचे रूप मोठे उज्ज्वल दिसते. सातवाहनांचा कारभार अगदी साधा असून धर्मशास्त्रांच्या नियमाप्रमाणे तंतोतंत चालत असे. त्या काळी बहुपत्नीत्व रूढ होते. त्याअन्वये सातवाहन सम्राटांना अनेक राण्या असत. पण वारसाची युद्धे त्यांच्या दीर्घ इतिहासात केव्हाच झाली नाहीत, आणि साम्राज्याच्या वाटण्याही कधी झाल्या नाहीत. आश्चर्याची गोष्ट अशी की तत्त्वतः हे सम्राट सर्वस्वी अनियंत्रित असून त्यांनी, आमची सत्ता ईश्वरदत्त आहे, असा दावा कधीच सांगितला नाही. शास्त्र व रूढी यांचा ते नेहमीच मान राखीत असत. "
 गौतमीपुत्र श्री सातकर्णी याविषयी लिहिताना ते म्हणतात, हा सम्राट सेनापती म्हणून एकपट थोर असला तर प्रशासक म्हणून दसपट थोर होता. तो जसा शूर सेनापती होता तसाच चतुर मुत्सद्दीही होता, आणि त्याची सामाजिक कर्तव्याची जणीव तशीच प्रखर होती. राजपुरुषाला योग्य व अवश्य त्या सर्व विद्यांमध्ये तो पारंगत होता. धर्मशास्त्राच्या आज्ञा, सर्वभूतहित या दोन चक्षूंनी त्याचा राज्यकारभार चाले. अनाथ, गरीब, रंजले गांजले यांचे पालन तो विशेष दक्षतेने, जातीने करी. शास्त्राज्ञेच्या बाहेर जाऊन अन्याय्य कर त्याने कधीही लादले नाहीत. " ( कॉप्रिहेन्सिव्ह हिस्टरी ऑफ इंडिया, पृ. ३१६-३१६ ).