पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/११६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
८९
महाराष्ट्रीय राजघराणी
 

लावणे युक्त होईल. सत्याश्रय पुलकेशी हा मराठ्यांचा, महाराष्ट्राचा राजा होता, त्यांना त्याने पराक्रमी बनविले हे ह्युएनत्संग व रमेशचंद्र दत्त यांचे म्हणजे आपण ध्यानी घ्यावे.

विजयनगर कोणाचे ?
 विजयनगरच्या संगम, सालुव, तुलुव व अरविद्व या चार सम्राट घराण्यांची भाषाविषयक वृत्ती पाहणे येथे उद्बोधक होईल. विजयनगरच्या साम्राज्याचे संस्थापक हरिहर व बुक्क हे मूळ आंध्रप्रदेशातील वरंगळच्या राज्यात सरदार होते, हे बहुतेक पंडितांना मान्य आहे. सूर्यनारायणराव, रंगाचारी, वेंकटरमणय्या यांच्या मते हे सरदार आंध्र- प्रांतीय, म्हणूनच तेलगू भाषिक होते. सालुव हे दुसरे घराणे. त्यांचे मूळपीठ निश्चित नाही. पण या घराण्यातील सर्व राजांचा तेलगूवर लोभ होता. ती भाषा त्यांना प्रिय होती. पुढले तिसरे घराणे तुलुव हे होय. हे मूळचे दक्षिण कर्नाटकातील तुलुवनाडू परगण्यातील घराणे होय. पण त्यांनी तामिळनाडमध्ये जाऊन अर्काटच्या परिसरात आपले राज्य स्थापिले होते. तेथून ते विजयनगरला येऊन सम्राटपदी आरूढ झाले. पण त्यांचा सर्व ओढा तेलगू भाषेकडे होता. या घराण्यातील अत्यंत थोर सम्राट कृष्णदेवराय हे तर निश्चितच तेलगू भाषिक होते. 'अमुक्तमाल्यदा' हा त्यांचा ग्रंथ तेलगू भाषेतच आहे. अष्ट दिग्गज म्हणून प्रसिद्ध असलेले त्याच्या राजसभेतील आठ कवी सर्व तेलगू होते. प्रसिद्ध भोजराजा हा माळव्यातला, म्हणून तो मालव भोज होय. कृष्णदेवराय तेलगूचा पुरस्कार करीत म्हणून त्यांना 'आंध्रभोज' म्हणत. सालुव नरसिंहापासून कृष्णदेवरायापर्यंत विजयनगरमध्ये तेलगूचे सुवर्णयुगच होते असे म्हणतात ( डॉ. वेंकटरमणय्या, हिस्टरी अँड कल्चर ऑफ दि इंडियन पीपल, खंड ६ वा, प्रकरण १२ वे ). के. ईश्वरदत्त यांच्या मते प्रारंभापासून तीनशे वर्षे विजयनगरच्या दरबारात तेलगूचेच वर्चस्व होते. आणि ते केवळ भाषेचेच नव्हे, तर रीति- रिवाजांचेही (विजयनगर- स्मृतिग्रंथ, पृ. ५४ ). विजयनगरला तेलगू भाषा व संस्कृती यांचे असे वर्चस्व होते हे डॉ. बी. ए. सालेटोर यांनाही मान्य आहे ( सोशल अँड पोलिटिकल लाइफ इन् विजयनगर एंपायर, खंड १ ला, प्रस्तावना, पृ. २३, २४ ). पण असे असले तरी विजयनगरचे वैभव हे कर्नाटकीय वैभव आहे असे कन्नडिग मानतात, आणि माझ्या मते ते सयुक्तिकच आहे. ' विजयनगर दरबारात तेलगूचे वर्चस्व होते ' असे म्हणणारांनीही ' कन्नडांच्या दरबारांत ते वर्चस्व होते ' असे म्हटले आहे, तेही याच जाणिवेने होय. वर सांगितलेल्या सर्व घराण्यांनी कर्नाटक हीच आपली कर्मभूमी मानली होती. तेव्हा ती कर्नाटकीय होत यात शंका नाही. डॉ. सालेटोर यांनी हरिहर व बुक्क हे मूळचे कन्नड होते असे ठरविण्याचा अट्टाहासाने प्रयत्न केला आहे. पण त्याचे काही प्रयोजन नाही, फलही नाही. त्यांनी कर्नाटक ही स्वभूमी मानली, कर्मभूमी मानली हे पुरेसे आहे. संगम, अरविद्व ही घराणी मूळ तेलगू असली तरी ती राजघराणी कर्नाटकीय होत यात शंका नाही.