पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/११४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
८७
महाराष्ट्रीय राजघराणी
 

अनेक शब्दांना त्या त्या काळात विशिष्ट अर्थ प्राप्त झालेले असतात, ते पुढे लुप्त होतात आणि मग ते शब्द दुर्गम होऊन बसतात. मराठा हा शब्द आज सर्व महाराष्ट्रीय समाज व शहाण्णव कुळीचे लोक या दोन्ही अर्थी वापरला जातो. वेदकाळी असुर हा शब्द इंद्र, वरुण या देवांनाही लावलेला आढळतो. चाहमान, परमार, या घराण्यांनी आपल्या कोरीव लेखांत स्वतः ब्राह्मण असल्याचे सांगितले आहे. तेव्हा ही कोडी दुर्गम म्हणून सोडून देण्याखेरीज काही गत्यंतर नाही.

कर्मभूमी
 फ्लीट, डॉ. भांडारकर, चिंतामणराव वैद्य, म. म. मिराशी यांच्या मते राष्ट्रकूट है मूळचे महाराष्ट्रातले होत. डॉ. अळतेकर यांना हे मत मान्य नाही. तसे मानल्यास, त्यांची मातृभाषा कानडी होती याचे स्पष्टीकरण करता येत नाही, असे ते म्हणतात. पण हा सगळा वाद हे घराणे मूळचे कोठले होते याबद्दलचा आहे, त्यांची कर्मभूमी कोणती होती, त्यांचे स्वराज्य कोठे होते याबद्दलचा नाही. आणि मूळ स्थान कोणते याला महत्त्व कसे नाही, हे मी वर अनेक ठिकाणी स्पष्ट केलेच आहे. भारतातली अनेक राजघराणी ज्या प्रांतात दीर्घकाळ स्थायिक होऊन राज्य करीत होती त्या प्रांतात ती मूळ अन्य प्रदेशातून आली होती, त्यांचे मूळ स्थान निराळेच होते असा इतिहासच आहे. म्हणून त्यांची कर्मभूमी कोणती, स्वराज्य कोणते या निकषांवरून निर्णय करावा असे मला वाटते. त्या दृष्टीने पाहता राष्ट्रकूट हे चालुक्यांप्रमाणेच महराष्ट्रीय ठरतात असे दिसेल.
 चालुक्यांप्रमाणेच राष्ट्रकूटांचे अनेक कोरीव लेख महाराष्ट्रातच सापडतात. वेरुळ, वर्धा, दिंडोरी, सांगली, मयूरखंडी (नाशिक जिल्हा ), संजाना ( ठाणे ), तळेगाव ढमढेरे, थांदक (चांदा जिल्हा ), पिंपेरी ( खानदेश ), तोरखेडे (खानदेश), अलास ( कुरुंदवाड ), खारेपाटण सामनगड ( कोल्हापूर ), जवरखेडा ( खानदेश ), मानोर (ठाणे) या ताम्रपटांवरून राष्ट्रकूटांची महाराष्ट्र ही कर्मभूमी व तशीच दानभूमीही होती हे दिसून येईल.

राज्यश्री केव्हा लोपली ?
 चालुक्य व राष्ट्रकूट यांच्या सत्ता महाराष्ट्राशी कशा अविभाज्यपणे निगडित होत्या, हे आणखी एका गोष्टीवरून दिसून येईल. चालुक्यसत्तेचा अस्त इ. स. ७५० च्या सुमारास झाला व राष्ट्रकूट सत्तेचा अस्त इ. स. ९७३ साली झाला. या दोन्ही सत्तांचा अस्त झाला हे केव्हा ठरले ? महाराष्ट्रातून त्यांच्या सत्ता नष्ट झाल्या तेव्हा. या दोन्ही घराण्यांनी वर सांगितल्याप्रमाणे कर्नाटक, गुजराथ, माळवा, कोसल, आंध्र, तामिळनाड, चोल, पांड्य, चेर हे देश अनेक वेळा जिंकले होते. तेथील राजांना कधी मांडलिक बनविले होते, कधी आपल्या इतर सामंतांना नेमिले होते. पण जसे हे देश