पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/१०५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
महाराष्ट्र संस्कृती
७८
 

 वाकाटकांचे मूळ राज्य नागपूर, विदर्भ, कुन्तल, अश्मक, मूलक या महाराष्ट्रातील प्रदेशात होते व त्यांचे साम्राज्य माळवा, कोसल, लाट, कलिंग व आंध्र या प्रदेशावर होते. त्यांचे बहुतेक सर्व कोरीव लेख, त्यांनी बांधलेली मंदिरे व त्यांच्या कारकीर्दीत कोरलेली लेणी विदर्भ, मराठवाडा या महाराष्ट्रातील प्रदेशात होती. त्यांनी महाराष्ट्री प्राकृताला आश्रय देऊन त्या भाषेत स्वतः काव्यरचनाही केली. एवंच त्यांचे सर्व कर्तृत्व महाराष्ट्रात झाले व त्यांची ही कर्मभूमी होती, हे निश्रित सिद्ध झाल्यामुळे हे राजघराणे महाराष्ट्राचे होते याविषयी शंका घेण्यास जागा राहात नाही.

दृढ अस्मिता
 इ. सनापूर्वी तिसऱ्या शतकात महाराष्ट्राला पृथगात्मता आली आणि त्याच वेळी या भूमीचे स्वतंत्र राज्य प्रस्थापित करणारे सातवाहन राजघराणे त्याला लाभले. या पहिल्या घराण्याचे राज्य साडेचारशे वर्षे टिकले. त्यानंतर पन्नासपाऊणशे वर्षे महाराष्ट्रावर आभीर या शकुशाणांप्रमाणेच परकीय असलेल्या जमातीचे राज्य होते. पण सुदैवाने लवकरच वाकाटक नृपती विन्ध्यशक्ती याचा उदय झाला आणि त्याच्या घराण्याने सुमारे तीनशे वर्षे महाराष्ट्रावर राज्य केले. याचा अर्थ असा की प्रारंभापासून म्हणजे इ. स. पूर्व २३५ पासून इ. स. ५५० पर्यंत म्हणजे प्रारंभीची सुमारे ८०० वर्षे महाराष्ट्राला स्वकीय राजसत्तेखाली राहण्याचे भाग्य लाभले. महाराष्ट्राची अस्मिता यामुळे निश्चित आणि दृढ होऊन गेली.

वादग्रस्त विषय
 पुढील काळात इ. स. ११८९ पर्यंत सहाशे साडेसहाशे वर्षे या भूमीवर बदामीचे चालुक्य, राष्ट्रकूट व कल्याणीचे चालुक्य या घराण्यांची सत्ता होती. आणि यांच्या महाराष्ट्रीयत्वाविषयी तीव्र वाद आहेत. माझ्या मते ही तीनही घराणी महाराष्ट्रीयच होती, हे सिद्ध करण्यास पुरेसा पुरावा आहे. तोच आता मांडावयाचा आहे. पण त्याआधी, आधीच्या थोर अभ्यासकांची मते काय आहेत, वादाचे स्वरूप काय आहे, अनुकूलप्रतिकूल कोण आहेत, त्यांची प्रमाणे काय आहेत, त्यांचा विचार केला पाहिजे. तो सर्व करून, या पंडितांच्या मतांचा परामर्श घेऊन, नंतर माझे मत मी मांडतो.
 डॉ. रा. गो. भांडारकरांच्या मते राष्ट्रकूट हे महाराष्ट्राचे खरे स्वदेशीय राजे होत. आंध्र, चालुक्य यांना ते मूळचे परस्थ मानतात. पण यासंबंधी त्यांनी कसलीच कारणमीमांसा केलेली नाही, काही उपपत्तीही सांगितलेली नाही ( कलेक्टेड वर्क्स, खंड ३ रा, पृ. ८५ ). आंध्राविषयी त्यावेळी पुरेसे संशोधन झाले नव्हते. त्यामुळे त्यांना त्यांनी विदेशमूल मानले तर नवल नाही. पण चालुक्य परकीय कसे तेही त्यांनी सांगितलेले नाही. त्यामुळे त्यांच्या मताची चर्चा करता येत नाही.
 कुलगुरू चिंतामणराव वैद्य यांनी या विषयाची आपल्या ' मध्ययुगीन भारत' या