Jump to content

पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/१०४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
७७
महाराष्ट्रीय राजघराणी
 

अकराव्या-बाराव्या शतकापर्यंत सर्व राज्यकर्त्यांनी केले. वाकाटकही त्याला अपवाद नव्हते. त्यांचे बहुतेक सर्व ताम्रपट आणि शिलालेख व त्यांच्या सचिवांचे व मांडलिकांचेही कोरीव लेख संस्कृतातच आहेत.
 आपल्या दृष्टीने महत्त्वाची गोष्ट अशी की हे सर्व लेख नागपूर, वऱ्हाड या प्रांतांतील म्हणजे महाराष्ट्रातले आहेत आणि त्यांतील काही लेख महाराष्ट्री प्राकृतात आहेत. म. म. मिराशी यांनी आपल्या ग्रंथात हे सर्व कोरीव लेख दिलेले आहेत आणि त्यांचा स्थलनिश्रयही केलेला आहे. त्यावरून असे दिसते की देवटेकजवळचे चिकमारा, हिंगणघाट, वर्धा जिल्ह्यातील मांडगाव, अमरावती जिल्ह्यातील घाटलडकी, मातुकली, कारंजा, असतपूर, अंजनवाडी, चांदा, वरदाखेट ( वरुड), नांदेड या गावचे हे ताम्रपट आहेत. ही सर्व गावे नागपूर, वऱ्हाड, मराठवाडा या प्रांतांतील आहेत हे स्पष्टच आहे. अंजठाच्या लेण्यांपैकी १६, १७ व १९ या क्रमांकाची लेणी वाकाटकांच्या कारकीर्दीत त्यांनी वा त्यांच्या सचिवांनी कोरलेली असून त्यांतील १६ व्या लेण्यात त्यांची वंशावळ दिलेली आहे. अजंठ्याच्या पश्चिमेस अकरा मैलांवर असलेल्या गुलवाडा या गावाजवळच्या घटोत्कच लेण्यात शेवटचा वाकाटक राजा हरिषेण याचा मंत्री वराहदेव याचा एक कोरीव लेख असून त्यात 'देवराजसूनुर्हरिषेणो' असा आपल्या स्वामीचा त्याने आदरपूर्वक उल्लेख केला आहे. वाकाटकांच्या सचिवांनी कोरविलेली लेणी जशी महाराष्ट्रात आहेत तशीच त्यांनी बांधलेली मंदिरेही महाराष्ट्रातच आहेत. पहिल्या प्रवरसेनाने बांधलेले प्रवरेश्वराचे देवालय, रामगिरीवरचे रामगिरी- स्वामीचे देवालय, अश्वत्थखेटकातील विष्णूचे मंदिर आणि द्वितीय प्रवरसेनाने प्रवर पूर ( पवनार ) येथे बांधलेले श्रीरामचंद्राचे मंदिर ही मंदिरे यांची साक्ष देतील. ही मंदिरे आता बहुतेक उद्ध्वस्त झाली आहेत. पण काहींचे अवशेष आहेत व काहींचा त्यांच्या ताम्रपटांत निर्देश आहे.
 वाकाटक पूर्णपणे महाराष्ट्रीय झाले होते याचा आणखी एक पुरावा म्हणजे त्यांनी संस्कृतप्रमाणेच प्राकृत साहित्यालाही आश्रय दिला होता हा होय. त्यांनी प्राकृताला आश्रय दिला होता, एवढेच नव्हे, तर स्वतः प्राकृतात ग्रंथरचनाही केली होती. वत्सगुल्म शाखेचा संस्थापक सर्वसेन याचे ' हरिविजय ' आणि नन्दिवर्धन शाखेचा द्वितीय प्रवरसेन याचे 'सेतुबंध' ही प्रसिद्ध काव्ये महाराष्ट्री प्राकृतात आहेत. शिवाय या राजांनी प्राकृतात सुभाषितेही रचली होती. हाल सातवाहन राजाने रचलेल्या ' गाहा सत्तसई' या ग्रंथात नंतरच्या काळात बरीच भर पडलेली आहे. त्यातील २१७, २३४, ५०४ व ५०५ या गाथा सर्वसेनाच्या म्हणून टीकाकारांनी मान्य केलेल्या आहेत. प्रवरसेनाच्याही नावावर ४५, ६४, २०२, २०८ व २४६ या गाथा नोंदलेल्या आहेत. काही टीकाकारांच्या मते आणखी ८/१० गाथा प्रवरसेनाच्या आहेत. त्यांनी त्यांचे क्रमांकही दिले आहेत. ( वाकाटक नृपती व त्यांचा काळ, मिराशी, पृ. ११५-१२९).