Jump to content

पान:महाराष्ट्राचे पंचप्राण.pdf/८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(७८)

सालीं आपली सरकारी नोकरी सोडली व तेजस्वी देशभक्तीनें भरलेलें शिक्षण देण्यासाठी एक नवीनच इंग्रजी शाळा पुण्यास काढण्याचें ठरविलें, ही गोष्ट आपल्या या बाळगोपाळांच्या जोडीला समजली. लगेच या बाळगोपाळांच्या जोडीनें म्हणजे बळवंतराव टिळक व गोपाळराव आगरकर यांनी 'आह्मी तुमच्या शाळेस येऊन मिळणार' असें विष्णुशास्त्री यांना पत्र पाठवून कळविलें. ही बाळगोपाळांची जोडी आपल्याला येऊन मिळणार हे ऐकतांच विष्णुशास्त्रयांना फार आनंद झाला. अशाच दुसऱ्या तरुण पदवीधरांनीं विष्णुशास्त्री यांना मिळण्याचे ठरविलें, व मग या सर्व उत्साही तरुण देशभक्तांच्या मदतीनें विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी जानेवारी ता. २, सन १८८० या शुभ दिवशीं 'न्यू इंग्लिश स्कूल' नांवाची इंग्रजी शाळा सुरू केली. ती शाळा लवकरच अतिशय भरभराटीस आली. यानंतर एक वर्षाने बाळगोपाळांच्या देखरेखीखाली आर्यभूषण छापखाना, व केसरी व मराठा वर्तमानपत्रे सुरू झालीं. तीही चांगली लोकप्रिय झालीं. केसरीचे प्रथम संपादक आगरकर झाले; व मराठा पत्राचे संपादक टिळक झाले. या पत्रांत कोल्हापूरचे कारभारी यांच्या संबंधीं कांहीं टीका आली. ती टीका आपली बेअब्रू करण्यासारखी आहे, अस त्या कारभास वाटून त्यांनीं बळवंतराव व त्यांचे मित्र गोपाळराव यांचेवर अब्रुनुकसानीचा दावा मुंबईचे हायकोर्टात लात्रिला. त्यांत या जोडीला दोषी ठरवून शिक्षा देण्यांत आली. यामुळे त्यांना १०१ दिवस तुरुंगवास भोगावा लागला. ते सुटून आल्यावर पुनः त्यांनी आपली सर्व कामें जोरांत सुरू केलीं. मध्यंतरी सन १८८२ च्या मार्च महिन्यांत विष्णुशास्त्री वारल्यामुळे या तरुण मंडळीस आपला मुख्य आधारच नाहींसा झाला असे वाटलें. तरी त्यांनी हातीं घेतलेलें काम अधिक जोरानें सुरू ठेवलें. न्यू इंग्लिश स्कूलच्या भरभराटीने बळवंतराव व त्यांचे मित्र यांना उत्तेजन आलें व बळवंतरावांची इच्छा होती त्याप्रमाणें एकदांचें 'फग्र्ग्युसन कॉलेज'