Jump to content

पान:महाराष्ट्राचे पंचप्राण.pdf/४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(४३)

मोठी क्रांति घडवून आणली ती महत्वाची व चिरस्मरणीय निबंधमाला अगदी सहज अशा रीतीनें जन्मास आली. यावरून मोठमोठ्या कार्याचे उगम नदीच्या उगमाप्रमाणे कसे अगदी लहान व क्षुल्लक असतात हें दिसून येईल.
 हे मासिक पुस्तक विष्णुशास्त्री यांनों अत्यंत मेहनत घेऊन इ. स. १८७३ पासून इसवी सन १८८० पर्यंत उत्तम तऱ्हेनें चालविलें. इतकें उत्तम विषयांनीं भरलेलें, इतकें शुद्ध विवेचनाने भरलेलें, . इतकी निरनिराळ्या विषयांची यथास्थित व पद्धतशीर माहिती देणारें व इतकें निर्भीड पण सत्पक्षपाती मासिक पुस्तक पहिल्यापासून शेवटपर्यंत सर्व एकट्यानेंच चालविलेलें हैं एवढेच. असले उत्तम मासिक पुस्तक पूर्वी झालें नाहीं व पुढे होईल कीं नाहीं याची शंकाच आहे. इतकें या मासिक पुस्तकाविषयीं वाचून यांत विषय तरी काय काय आले असतील हे समजण्याची बाळांनो तुम्हांला सहजच इच्छा होईल. म्हणून त्यांत कोणकोणते विषय आले होते ते सांगत. या मासिक पुस्तकांत १ मराठी भाषेची सांप्रतची स्थिति, २ विद्वत्व आणि कवित्व, ३ संपत्तीचा उपयोग, ४ इतिहास, ५ भाषादूषण, ६ लेखनशुद्धि, ७ भाषापद्धति, ८ वाचन, ९ भाषांतर, १० लोकभ्रम, ११ गर्व, १२ वक्तृत्व, १३ इंग्रजी भाषा, १४ डॉ. जॉन्सन, १५ मोरोपंताची कविता, व १६ आमच्या देशाची स्थिति, या विषयांवर माहितीने अतिशय भरलेले, अनेक वेळ वाचावेसे वाटणारे अत्यंत उपयुक्त असे निर्बंध आलेले आहेत.शिवाय, निरनिराळ्या पुस्तकांचें परीक्षण फारच मार्मिक तऱ्हेनें केलेलें आहे. ह्या निबंधमालेचे एकंदर ८४ अंक काढून विष्णुशास्त्री यांनी ती बंद केली. याचे कारण निबंध लिहून लोकांचे विचार पालटण्याचें इच्छिलेलें कार्य झालें असें त्यांस वाटलें, व शिवाय त्यापुढे ग्रंथमाला नांवाची एक उत्तम ग्रंथांची माला त्यांचे मनांतून तयार करावयाची होती.