या ग्रंथाविषयीची सयाजीरावांच्या मनातील आपुलकी आणि आदर विशद करताना रियासतकार सरदेसाई लिहितात, "हे पुस्तक म्हणजे महाराजांच्या नवीन प्रवृत्तीचा केवळ पाया होय. ऐनेराजमेहेलच्या अनेक आवृत्ती आजपर्यंत झाल्या आहे आणि त्यांतील प्रकरणे पुनः पुनः चर्चा व विचार करून संपूर्ण करण्याकडे महाराजांनी इतके परिश्रम केले आहेत की दुसऱ्या कोणत्याही विषयावर ते केले नसतील. " धर्मविषयक ज्ञानाच्या सर्वसामान्य जनतेतील प्रसारासाठीची सयाजीरावांची अगदी सुरुवातीच्या काळापासूनची धडपड यातून अधोरेखित होते. १८८७ मधील पहिल्या युरोप दौऱ्यानंतर सयाजीरावांनी कोणालाही न दुखावता प्रायश्चित्त घेतले. पुढे लगेचच सयाजीरावांनी प्रायश्चित्त घेण्यास कायद्याने बंदी घातली. १८९२ मध्ये राजवाड्याच्या देवघरातील धार्मिक विधींच्या खर्चाचे १००० पानांचे तपशीलवार बजेट छापून घेतले.
हिंदू धर्मपरंपरेतील ब्राह्मणास अन्नदान केल्याने महत्पुण्य लाभते या समजुतीमुळे १७८२ पासून बडोद्याच्या राजवाड्यात दररोज ब्राह्मण भोजनाची प्रथा सुरू झाली. पुढे या भोजनपंक्तीस उपस्थित राहणाऱ्या लोकांची संख्या अमर्याद प्रमाणात वाढल्यामुळे भोजनपंक्तीऐवजी महाराष्ट्रीयन ब्राह्मण लोकांना २ भाग तांदूळ व १ भाग डाळ या प्रमाणात कोरड्या खिचडीचा शिधा देण्यास १८०८ पासून सुरुवात करण्यात आली. सयाजीरावांचे दत्तक वडील खंडेराव महाराजांची इस्लाम धर्मावर विशेष श्रद्धा