पान:महाराजा सयाजीराव आणि भारताचा स्वातंत्र्यलढा.pdf/३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पत्र पाठवले. मुंबईच्या गव्हर्नरांनी या कृत्याबद्दल सयाजीरावांची लेखी माफी मागितली. हे उदाहरण भारतातील इतर संस्थानिकांहून सयाजीरावांचा दर्जा कसा वेगळा आणि इंग्रजांच्या बरोबरीचा होता हे स्पष्ट करते.

सयाजीराव आणि महात्मा गांधी

 १९१५ साली आफ्रिकेहून परतलेल्या महात्मा गांधींच्या अस्पृश्योद्धाराच्या कार्याबद्दल सयाजीरावांना आपुलकी होती. १९२३ मध्ये बडोद्यात केलेल्या भाषणात सयाजीराव म्हणतात, "आम्ही अस्पृश्य बांधवांना समता आणि बंधुत्व ही मानवी मूल्ये नाकारत आहोत. महात्मा गांधी आणि त्यांच्या विचारांची माणसे या सामाजिक प्रश्नांसाठी फार मोठे काम करत आहेत. जर आम्ही महात्मा गांधींचा सल्ला आणि मार्गदर्शन यांचे अनुकरण केले नाही, तर आपणास फार मोठ्या पश्चात्तापास सामोरे जावे लागेल.”

 ज्या काळात गांधींचे नाव उच्चारणे हा गुन्हा ठरत असे त्या काळात सयाजीरावांनी जाहीर भाषणात गांधींचे अनुकरण करण्याचा सल्ला जनतेला दिला होता. ही बाब स्वातंत्र्यचळवळीच्या इतिहासातील क्रांतिकारक घटना म्हणून विचारात घ्यावी लागते. या भाषणामुळे ब्रिटिश सरकारमध्ये खळबळ उडाल्यानंतर गांधींच्या अस्पृश्य उद्धाराच्या कार्याची आपण स्तुती केल्याचा 'खुलासा' महाराजांनी केला.

महाराजा सयाजीराव आणि भारताचा स्वातंत्र्यलढा / ३५