पान:महाराजा सयाजीराव आणि प्राच्यविद्या.pdf/१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

होते. ब्राह्मणी, जैन आणि बौद्ध या तिन्ही धर्मांच्या तुलनात्मक अभ्यासातून त्यांनी बौद्ध धर्मातील तंत्र संप्रदायाचे अनन्य महत्त्व उजेडात आणले.
 ज्याप्रमाणे हिंदू तंत्र संप्रदायाने बौद्ध धर्मातील वज्रयानातून तांत्रिक संप्रदाय उसना घेतला आहे त्याचप्रमाणे महायान पंथातील तत्त्वज्ञांनी हेतुत: आणि जाणीवपूर्वक हिंदू देवता बौद्ध तंत्राशी जोडून घेतल्या. मध्ययुगीन हिंदू परंपरेतील शक्ती देवता आणि महायान पंथातील प्राज्ञ (Prajna) या देवतांमधील साम्य भट्टाचार्यांनी शोधून काढले. त्यांचे हे सर्व योगदान एकूणच बौद्ध धर्माच्या बुद्धोत्तर तत्त्वज्ञानाचे महत्त्व अधोरेखित करते. भट्टाचार्यांचे हे योगदान पाहता सयाजीरावांनी २९ वर्षे बडोदा प्राच्यविद्या संस्थेचे संचालक म्हणून कार्यरत असणाऱ्या बिनोयतोष भट्टाचार्य यांचे पुढील ग्रंथ या संस्थेने प्रकाशित केले.

 बिनोयतोष भट्टाचार्य यांनी संपादित केलेल्या साधनमाला ग्रंथाचा पहिला खंड १९२५ मध्ये तर दुसरा खंड १९२८ मध्ये प्रकाशित झाला. या ग्रंथामध्ये वेगवेगळ्या देवतांच्या आराधनेसाठी करावयाच्या विधींची अथवा साधनांची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. १९२९ मध्ये भट्टाचार्यांचा 'टू वज्रयान वर्क्स' हा ग्रंथ प्रकाशित करण्यात झाला. या ग्रंथात तांत्रिक बौद्धवादाचा उगम आणि विकासाचा इतिहास मांडण्यात आला. त्याचबरोबर ज्ञानसिद्धी ग्रंथातील उपदेशाचे महत्त्व विशद करण्यात आले आहे. ‘गुह्यसमाज तंत्र अथवा तथागतगुह्यक' हा

महाराजा सयाजीराव आणि प्राच्यविद्या / १७