सभास्थानी सयाजीराव दाखल होताच सर्व जातींच्या जमलेल्या प्रचंड जनसमूहाने उभे राहून 'श्रीमंतांचे स्वागत केले. अकरा साडे अकराच्या तीव्र उन्हात ही सभा सुरू होती पण आमराईची ती गर्द सावली तीन हजार जनसमूहाचे उन्हापासून संरक्षण करत होती. सर्व स्त्रीपुरुष सयाजीरावांचे दर्शन करून स्वत:ला भाग्यशाली मनात होते. सर्वांचे डोळे श्रीमंतांच्या त्या तेजस्वी मूर्तीकडे वेधून गेल्याचे स्पष्ट दिसत होते.
कर्मवीरांचे स्वागतपर भाषण
यावेळी भाऊराव पाटलांनी महाराजांचे स्वागत करताना जे भाषण केले ते फारच ऐतिहासिक आहे. या भाषणात भाऊराव पाटील म्हणतात, “ श्रीमंत महाराजसाहेब, श्रीमंत युवराज प्रतापसिंह, श्रीमंत राजपौत्र उदयसिंह व बंधुभगिनीहो, माझ्यासारख्या फकिराच्या आमंत्रणांस मान देऊन श्रीमंत महाराजसाहेब, आपणास हजार प्रकारची महत्त्वाची, निकडीची कामे असताना व आपले प्रकृतिमान बरे नसतानादेखील आपण तकलीफ सोसून, वेळांत वेळ काढून सर्व परिवारासह या संन्याशाच्या झोपडीत आलात त्याबद्दल मी श्रीमंतांचे आभार कोणत्या शब्दांनी मानू तेच मला समजत नाही. माझ्याजवळ आपल्यासारखा थोर राजर्षीचे योग्य स्वागत करण्यास अंतःकरणाच्या जिव्हाळ्याशिवाय दुसरे काही नाही. महाराज, आपण केलेल्या या अनुग्रहाबद्दल मी आपला उतराई कसा होऊ तेच मला समजत नाही. पण आपणास मी आमंत्रण केले