पान:महाबळेश्वर.djvu/40

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( ৩ )


त्याजबरोबर युद्ध करण्यास गेले असतां, विष्णूनें अतिबळाचा वध केला. हे वृत्त महाबळास कळतांच तो देवांबरोबर समर करण्यास आला. त्याचे प्रतापापुढे देवत्रयाचा ठिकाण लागेना. या कारणास्तव देवांनी जाऊन महामाया जी देवी तिचे स्तवन केले व दैत्याचा नाश होईल अशी युक्ति सांगावी म्हणून विनंति केली. देवी प्रसन्न होऊन तिने त्यांस मोह घालून संगरांतून परत आणले. नंतर महाबळाने संतुष्ट होऊन वर मागण्याविषयीं देवांस सांगितले. तेव्हां " तूं आमचे हातून मरावास " हे वरदान त्यांनी मागितले. सर्व देव आपणास शरणागत झाले आहेत, आपण विश्वाचे स्वामी आहोत, व विश्वाचा उपभोगही घेतला आहे त्याअर्थी देहाचे सार्थक होऊन गेले, आतां मरण यावें हेच उचित, असा विचार करून दैत्याने देवांस देह अर्पण केला. नंतर देवांनी त्यास मुक्तिपद देऊन वर मागण्यास सांगितले. तेव्हां दैत्याने देवाचा स्तव करून वर मागितला तो असाः--