________________
दुसरा समुलास : शिक्षण-विचार निवडीची भूमिका नवीन पिढीकडे जुनी पिढी आपल्या गुणांचे संक्रमण दोन प्रकारे करत असते. अनुवंशिक गुणांचा वारसा आई-वडिलांकडून मिळतो, सांस्कृतिक गुणांचा वारसा मिळण्याची व्यवस्था समाजाला मुद्दाम करावी लागते. सत्यार्थप्रकाशाच्या दुसऱ्या समुल्लासात मुलांच्या प्राथमिक शिक्षणाचा विचार केला आहे. महर्षी दयानंदांच्या मते प्राथमिक शिक्षण म्हणजे मुलांना शिक्षकांच्या हातात सोपवण्यापूर्वीचे शिक्षण. हे प्राथमिक शिक्षण आई-वडिलांनीच केले पाहिजे. मुलाला शुद्ध बोलायला शिकवणे, सदाचार शिकवणे, अक्षर ओळख शिकवणे हे आई-वडिलांचेच कर्तव्य आहे. दयानंदांचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ देवनागरी अक्षरे न शिकवता अनेक भारतीय लिप्यांची अक्षरे मुलांना आई-वडिलांनी शिकवावीत असे दयानंदांचे म्हणणे होते. इथे ते मुलगा किंवा मुलगी या दोघांनाही ती पाच वर्षांची होताच मुळाक्षरे शिकवावीत असा मुद्दाम उल्लेख करतात. इतरांशी कसे वागावे हे शिकवताना आई-वडिलांनी विद्वान आणि अतिथींशी कसे वागावे व नोकर-चाकरांशी कसे वागावे हे देखील आपल्या मुलांना शिकवावे असे म्हटले आहे. भूत-प्रेत, फलज्योतिष आणि मंत्र-तंत्र या खोट्या गोष्टींवर मुलांची अंधश्रद्धा बसणार नाही यासाठी भ्रमात गुरफटून टाकणाऱ्या सर्व गोष्टींची माहिती आई-वडीलांनी मुलांना द्यावी; असे दयानंद म्हणतात. प्राथमिक शिक्षणाबाबतचा दयानंदांचा हा विचार अतिशय क्रांतिकारक वाटतो. महर्षी दयानंद काय म्हणाले ?