पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/78

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

त्याप्रमाणे ह्यावेळी त्याच्या हातून कांहींच घडून येईना. सदाशिवरावभाऊनें त्याला चुचकारून, दरडावून, स्तुति करून, रागे भरून, टोचून, खोंचून, नानाप्रकारे लिहिले. परंतु काम न करण्याचे आपलें व्रत त्याने काही सोडले नाही. पेशव्यांचे साहाय्य युक्तीने, प्रयक्तीने, बहाण्याने व शिताफीनें न करण्याचा उद्योग त्याने साधेल तितका केला. बोलण्यांत व लिहिण्यांत मात्र गोड शब्द वापरण्याला कसूर केली नाही. पैसे लवकरच पाठवून देतों, सांगाल काम तें ताबडतोब कारतों, वगैरे मायन्यादाखल वाक्यांनी सजविलेली पत्रे त्याने सदाशिवरावभाऊला सतत लिहिली ( लेखांक २०६, २६४ ). त्यामुळे भाऊचें मन गोविंदपंताविषयी नरम राहिले. बाकों गोविंदपंताचें हें कचराईचे वर्तन सदाशिवरावभाऊच्या ध्यानात आले नाही असे नाही. ह्या गृहस्थाच्या हातून कामें नीट होऊन येत नाहीत हे भाऊ जाणून होता. त्याला त्याने ह्याच वेळी काढून टाकावयाचें; परंतु, तसें एकदम करणे दुरापास्त होते. मल्हारराव होळकर व जनकोजी शिंदे ह्यांच्या खालोखाल वजनदार माणूस ह्मणजे गोविंदपतच होता. गोविंदपताला काढिले झणजे त्याच्या जागी ह्या सरदारांपैकी कोणी तरी त्याच्या प्रांतांत पाठविणे जरूर होते. परंतु हे दोघे सरदार गेल्या लढाईत अगदी हैराण झाले होते. तेव्हां त्यांना आपल्या जवळच ठेवणे भाग होते. शिवाय, ह्या सरदारांच्या सैन्याला घेतल्याशिवाय आपल्याला अवदालीशी बरोबरीच्या नात्यान सामना करता यईल अशी भाऊची समजत नव्हती. ह्याकरितां गोविंदपंताला एकाएकी तोडणे भाऊला प्रशस्त वाटेना. तशांत गोविंदपंत अगदीच काही उपयोगी पडणार नाही असे भाऊचे मत नव्हते. यवनांच्या द्वेषाने, शिपाईगिरीच्या नैसर्गिक तडफेने, लोकांच्या लज्जेनें व धन्यावरील स्वामिभक्तीने प्रोत्साहित होऊन गोविंदपंत आपली बाजू संभाळील असा भाऊचा तर्क होता. थोडे कडक बोललें, थोडसा धाक दाखविला मगजे गोविंदपंत ताळ्यावर येईल व सांगितलेली कामगिरी बजावील असा भाऊचा अंदाज होता. ह्याच तर्कावर व अंदाजावर भिस्त ठेवून सदाशिवरावभाऊनें गोविंदपंताला अंतर्वेदीत राहू देऊन त्याच्याकडे आणीक कांही कामगिऱ्या सोपविल्या. यमुनानदीला पाणी अतिशय आल्यामुळे व जड सामान नेण्यास नावा वेळेवर न मिळाल्यामळे सदाशिवरावभाऊला यमुना उतरून अबदालीचें पारपत्य करण्याचे साधलें नाहीं. तेव्हां त्याने शत्रूच्या पारपत्याची दुसरी योजना केली अवदाली, नजीबखान व सजाउद्दौला हे ह्यावेळी दिल्लीजवळ यमुनेच्या उत्तरतीराला शिकंदयावर जाऊन बसले होते. त्यांच्या पाठीला गंगानदी असून तोंडाला यमुना नदी होती. डाव्या बाजूला सकुराबादपर्यंत जाटांची, मराठ्यांची व गोविंदपंताची ठाणी बसली होती. उजव्या बाजूला मात्र वेळ पडल्यास सरहिंदाकडे निसटून जाण्यास त्यांना मार्ग होता. सदाशिवरावाला यमना उतरतां आली असती तर त्याने अबदालीला पूर्वेकडून पश्चिमोत्तरेकडे रेटीत नेले असते. आतां सदाशिवरावाच्या मनांत अशी योजना आली की यमुनेच्या दक्षिणतीराने मथरा, दिल्ली. कुंजपुरा ह्या शहरांवरून जाऊन पश्चिमोत्तरेकडून यमुना उतरून अंतर्वेदीत यावे व