पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/70

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

करून मराठ्यांवर चाल केली. इतक्यांत इकडे अबदालीचा शह आला. त्यामुळे नजीबखान व सुजाउद्दौला ह्यांना तसेच ठेवून ( लेखांक १५७) दत्ताजीनें अबदालीकडे तोंड वळविले. आपल्यावरचे संकट गेलें असें पाहून सुजाउद्दौला अयोध्येस आला. त्याच्याकडे अबदालीने किंवा मराठ्यांनी तीन महिने झणजे १७५९ च्या डिसेंबरपासून १७६० च्या मार्चपर्यंत ढुंकून सुद्धा पाहिले नाही. परंतु, हिंदुस्थानांत येण्याचे जेव्हां सदाशिवरावभाऊचें ठरले तेव्हां त्याने गोविंदपंताला सुजाउद्दौल्याशी स्नेह करण्यास सांगितले. आपला आमचा स्नेह वडिलोपार्जित आहे; सरदारांनी व चिरंजीवांनी आपले ठायीं ममतेंत अंतर केले नाहीं; अबदालीची जड हिंदुस्थानचे पातशाहीत रुतों देणे अयोग्य आहे, वगैरे कान. गोष्टी सांगोन सुजाउद्दौल्याला आपल्या बाजूला ओढण्याचा प्रयत्न करावा; पातशहाजादा अल्लीगोहर व पट्टण्याचा सुभेदार जाफरअल्लीखान, ह्यांना अनुकूल करून घ्यावें; हिंदपत वगैरे बुंदेले व यमुनापारचे रजपूत संस्थानिक ह्यांना चाकरीस सिद्ध करावें; अबदालीकडील बारीक वातमी काढून पाठवावी व वीस पंचवीस लाख रुपये ताबडतोब हिंदुस्थानांत स्वारी आली ह्मणजे पाठवून द्यावे; इतक्या कामगिऱ्या हिंदुस्थानच्या रस्त्यावर असतांना सदाशिवरावभाऊनें गोविंदपंताला सांगितल्या. मुद्दाम गोविंदपंतालाच ह्या कामगिऱ्या सांगण्याचं कारण असे की, शिंदेहोळकर ह्यावेळी अबदालीशी झगडण्यांत गुंतले होते व तें काम करून ते अगदी थकून गेले होते. शिंदेहोळकरांच्या खालोखाल ह्मणण्यासारखा वजनदार माणूस हिंदुस्थानांत गोविंदपंतच होता. यद्यपि गोविंदपंताला सरंजामी सरदारी प्राप्त झाला नव्हती व तो कोणत्याहि प्रांताचा सुभेदार नव्हता, तत्रापि मातबर मामलतदार ह्मणून त्याची अलीकडे दहा पांच वर्षे बरीच प्रसिद्धि झाली होती. त्याला सरकारांत रसद चादा लाखाचा भरावी लागत असून, त्याची वार्षिक मिळकत सामान्य नव्हती ( लेखांक १३२). तो दहा हजार फौज बाळगांत असून तत्प्रीत्यर्थ पंचवीस लाख रुपये सरकारांतून खात अस ( लखांक २४३ ). इतकेहि करून त्याची गणना मामलतदारांतच होत असे (लखाक २४२ ). सरदारांत आपली गणना व्हावी एतत्प्रीत्यर्थ त्याचे सर्व प्रयत्न चालले होते. मख्त्याच्या कमाविशी करून त्याने सरकारचा फायदा करून दाखविला होता. फौज जवळ ठेवून एखाद्या सरदाराप्रमाणे त्याने अंतर्वेदीत अंमल बसविला होता (लेखांक २४४ ). अंतर्वेदीतील रोहिले सरदार व सुजाउद्दौला ह्यांच्याशी तो चांगला स्नेह ठेवून असे. काशीकडे कोणी सरदार अगर विद्वान् ब्राह्मण जावयाचा असला ह्मणजे त्याला गोविंदपंताच्या साहाय्याची जरूर पडे व गोविंदपंत तें मोठ्या उत्सुकतेने देई. सारांश, कन्हाडे लोकांचे ठायीं सर्वत्र साखर पेरून आपले हित करून घेण्याचा जो एक मोहक गुण आहे तो गोविंदपंताचे अंगी अमप होता. गोविंदपंताचे हे बाह्य स्वरूप झाले. गोविंदपंताचें अंतःस्वरूप फारच निराळे होते. मख्त्याच्या कमाविशी करून त्याने सरकारचा नफा करून दाखविला होता खरा; परंतु, मख्त्याची कमावीस जाऊन गोविंदपंताला जेव्हां बुंदेलखंड व अंतर्वेद ह्या प्रांतांची बिनमरस्त्यांची