Jump to content

पान:मराठी रंगभुमी.djvu/94

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
७८
मराठी रंगभूमि.

घेतला असून त्यांत शंकराचार्यांचा जन्म, त्यांचे बालपण, विद्याभ्यास, मंडनमिश्रादि अनेक मतवाद्यांस वादांत जिंकून दिग्विजय करणे इ. गोष्टी वर्णिल्या आहेत. आचार्यांचा इतिहास हा विषयच शांतरसप्रधान असल्यामुळे तो नाटकास योग्य नाही. अर्थात् या नाटकाच्या प्रयोगाचा प्रेक्षकांच्या मनावर विशेष परिणाम होत नसे. आचार्यांचें सबंध चरित्र नाटकांत न घालतां त्यांतील काही भाग आनुषंगिक ठेवून त्या काळच्या एखाद्या प्रसंगावर नाटक रचलें असतें तर तें विशेष खुलले असते असे आमचे मत आहे.
 जुन्या नाटकमंडळींत इचलकरंजीकर हे 'थोरले माधवराव' नाटक करीत असत. यानंतर कोल्हापुरच्या राजाराम कॉलेजच्या मंडळीने 'गुणोत्कर्ष' केले. तेथून शाहूनगरवासी मंडळी 'बाजीराव आणि मस्तानी,' 'पानपतचा मुकाबला', 'बाजी देशपांडे', 'राणा भीमदेव' ही ऐतिहासिक प्रसंगावरची नाटकें करूं लागली. उंब्रजकर वगैरे दोन तीन मंडळींनीं 'टिपूसुलतानाचा फार्स', 'अफझुलखानाचा फार्स', 'चंपानाटक', 'निश्चयाची पगडी' ही नाटके केली. १८८९ च्या डिसेंबर महिन्यांत पुण्यास कानिटकर आणि मंडळीने रा. ना. बा. कानिटकर यांनी केलेल्या 'श्रीशिवाजी नाटका'चा प्रयोग करून खेळाचे उत्पन्न काँग्रेस सभेकडे दिले. श्रीशिवाजीमहोत्सव सुरू झाल्यावर 'नरवीर मालुसरे' हे नाटक