पान:मराठी रंगभुमी.djvu/231

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१९७
भाग ३ रा.


अलीकडचे शिवाजी, तुकाराम, अहिल्याबाई इत्यादि व्यक्तींचीं सोंगें घेऊन रंगभूमीवर येणारे नट जर सद्वर्तनाचे किंवा शुद्धाचरणाचे नसतील तर त्या व्यक्तींच्या सोंगांचें वजन कसें पडेल ? किंवा त्यांच्या तोंडून निघणा-या उपदेशांचा सुपरिणाम तरी कसा होईल ? दुष्ट मनुष्याच्या सोंगाची बतावणी करणा-या इसमास त्याचें खासगी वर्तन फारसें आड येणार नाहीं; पण वर सांगितल्या प्रकारच्या व्यक्तींची भूमिका बजावीत असतां तें वर्तन आड आल्याशिवाय कधीही राहणार नाहीं हें नाटकवाल्यांनीं नेहमीं लक्षांत ठेवावें. त्यांतून शुद्धाचरणाच्या पौराणिक, धार्मिक किंवा ऐतिहासिक थोर पुरुषांच्या भूमिका घेणा-या इसमांनीं तर ही गोष्ट विशेष लक्षांत ठेवावी. एवढ्यावरून दुष्ट मनुष्याची भूमिका घेणा-या इसमानें सदाचरणानें वागुं नये असा आमचे ह्मणण्याचा अर्थ नाहीं. त्यानें सुद्धां तसेंच वागलें पाहिजे; पण चांगल्या मनुष्याची भूमिका घेणारानें तर त्याहूनही चांगलें वागलें पाहिजे. कारण वर सांगितल्याप्रमाणें तामसवृत्ती ही जात्याच मनुष्यांत प्रबल असल्यामुळे तिचा अभिनय करून दाखविण्यास किंवा तिच्याशीं तादात्म्यवृत्ती होण्यास फारसा वेळ लागत नाहीं; पण सत्ववृतीचा अभिनय करणें कठिण असून तिच्याशीं आपलें व प्रेक्षकांचें तादात्म्य करणें कठिण असल्यामुळे त्याबद्दल नाटकवाल्यांनीं अधिक खबरदारी घेतली पाहिजे. आतां ' नाटक-