पान:मराठी रंगभुमी.djvu/181

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१६३
भाग २ रा.


' वीरतनया ' पेक्षां ' मूकनायक ' अनेक कारणांनीं कमी प्रतीचें आहे. वीरतनयांतील शालिनी, शूरसेन, वगैरे कित्येक पात्रांचे गुण अनुकरणीय असून त्यांचे स्वभाव धीरोदात्त व गंभीर बनविण्याविषयीं ग्रंथकर्त्यांनें बरीच मेहनत घेतली आहे. मूकनायकांत अशा दर्जाचें पात्र एकही नाहीं. उलट, “ कुलीन स्त्रियांस न शोभणारें सरोजिनीचें सौजन्याभावयुक्त विक्रांताशीं वर्तन व संभाषण आणि विक्रांताचें धीरप्रशांत नायकास अननुरूप असें उतावळेपणाचें पोरकट वर्तन व अपरिचित राजकन्या सरोजिनीचे महालांत जाऊन आपली सभ्यता व उच्चता साफ सोडून देऊन तिच्याशीं एकदम प्रणयालाप सुरू करणें, ” अशा प्रकारचे मुख्य पात्रांच्या ठायीं सुद्धां अक्षम्य दोष आहेत. आतां संविधानकांत चमत्कृति, सुसंस्कृत विनोद व उपमा अलंकार घालून जागजागीं प्रगट केलेले सुविचार यांनीं यां नाटकास बरीच शोभा आणली आहे. तथापि, दुर्बोध पद्ये, दासीपासून नायकापर्यंत सर्व पात्रांच्या तोंडीं उपमा-अलंकारांची रेलचेल, साधारण लोकांस न कळण्यासारखे विचार, इत्यादिकांनीं स्वाभाविक सौंदर्यात उणेपणा पडून नाटक येथून तेथून शास्त्रीय झालें आहे व त्यामुळे प्रयोगाची छापे पडावी तशी पडत नाहीं. या नाटकांत रा. जोगळेकर हे विक्रांताचें (मुक्याचें) काम करीत असून रा. गोरे हे सरोजिनीचें करीत असतात; व हीं दोन्ही कामें