Jump to content

पान:मराठी रंगभुमी.djvu/२७५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
२४१
भाग ३ रा.

करण्याचे चाललेले प्रयत्न, आणि दुराचारी लोकांचे सद्यःसुखदायी परंतु परिणामीं नाशकारक चरित्र इत्यादि प्रसंग मुद्दाम आणुन त्यांतून अखेर सद्गुणांचा विजय आणि दुर्गणांचा पराजय दाखवितात. असे भिन्न भिन्न प्रकारचे प्रसंग आणिल्यावांचुन रसनिष्पत्ति व्हावी तशी होत नाहीं. रसनिपत्तीविषयींचें ज्ञान करून घेण्याची ज्यांची इच्छा असेल त्यांनी कालिदास, भवभूति व शेक्सपिअर यांची नाटकें अनेक वेळ लक्षपूर्वक वाचावी आणि त्यांनी पात्रांच्या तोंडी भाषणे किती मार्मिकतेनें घातली आहेत हें पाहून अमक्या पात्राच्या तोंडी अमके वाक्य कां घातले आणि अमका प्रसंग अमक्या ठिकाणीं कां घातला असा स्वतःच्या मनाशी विचार करावा. अशा रीतीनें लक्षपूर्वक दहापांच नाटकें वाचली तरी पुरेत, तेवढ्यावरून रसनिष्पत्तविषयींचें आवश्यक तेवढे ज्ञान त्यांना सहजासहजीं प्राप्त होईल.
 नाटकरचनेत मुख्य कठिण भाग ह्मटला ह्मणजे अखेरीचा. पुष्कळ नाटकांत पर्यवसान नीट न साधल्यामुळं एकंदर नाटकांची खराबी झालेली आढळून येईल. कित्येकांना संविधानकाची जुळणी अगोदर चांगली करतां येते; परंतु अखेरीस त्यांतील गुंतागुंत उकलितां येत नाही. कित्येक नाटकांत संविधानकाच्या पूर्वभागावरून त्याचें पर्यवसान अमक्या तऱ्हेनें होईल असें प्रेक्षकांना वाटत असतें, परंतु नाटककर्त्याने ते अखेरीस निराळ्याच झोंकावर नेल्यामुळे प्रेक्षकांची फार निराशा होते. "मनसा चिंतितं कार्य दैवमन्यंत्र चिंतयेत्" अशी जगाची रहाटीच पडल्यामुळे एक प्रकारें अशी निराशा होणें हे देखील सृष्टीचें कार्यच म्हणतां येईल; आणि त्याबद्दल नाटककर्त्यांस दूषण न देतां उलट त्यांस शाबासकी देणेंच योग्य असेंही कित्येकांस वाटल्यास वावगें नाही. पण येथें एक गोष्ट लक्षात ठेविली पाहिजे ती ही कीं, अपेक्षित तऱ्हेनें नाटकाचे पर्यवसान न करतां अन्य रीतीनें करण्यांत नाटककर्त्यानें कल्पनातीत असे प्रसंग विनाकारण घुसवडून देऊ नयेत. सहजगत्या ते येण्यासारखे असतील तर हरकत नाही.


 १६