पान:मराठी रंगभुमी.djvu/२६४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
२३०
मराठी रंगभूमि.

बाह्य वस्तूंनीं न होतां नाटकातर्गत वस्तूंनीं होणें. ज्याप्रमाणें भूमितींत गृहित गोष्टीवरच एखाद्या प्रमेयाची स्थापना करण्यांत येते, किंवा ज्याप्रमाणें गिरणींतील प्रत्येक उत्तरोत्तर चक्राचें चालन पूर्व चक्राकडूनच झालें पाहिजे त्याप्रमाणेंच नाटकाचीही गोष्ट आहे.
 वरील तीन नियमांचा केवळ ऋणात्मक उपयोग आहे. म्हणजे त्यांची प्रवृति दोष टाळण्याकडेच आहे. याशिवाय कांहीं लहानसान नियम लक्षांत वागविणें अवश्य आहे. नाटकाच्या आरंभीं कथानकाची गति मंद असावी व उत्तरोत्तर ती शीघ्रतर होत जाऊन शेवटीं फारच सपाट्याची असावी. असें झाल्यानें प्रेक्षकांस नकळत त्याचें लक्ष संविधानकाच्या ओघावरोवर वेगानें पुढें जातें. चित्रपटावर काढिलेल्या सभामंडपाचे अलीकडचे स्तंभ ज्याप्रमाणें अंतराअतरानें आणि पलीकडील जवळ जवळ काढिले असतात; त्याचप्रमाणें नाटककारानेही पुढील पुढील प्रवेश पहिल्या पहिल्या प्रवेशापेक्षां आंखूड केले पाहिजेत. त्याचप्रमाणें नाटकाचा आत्मा चिंतन नसून कृती आहे. हेंही विसरतां कामा नये. संविधानकांतील पुढील भाग निकट असावेत तसे पूर्वीच्या भागापेक्षां अधिक उत्कट व अधिक चमत्कृतिजनकही असले पाहिजेत.आकाशांतून वेगाने खाली येणाऱ्या अयोगोलाचें संविधानकानें अनुकरण केलेलें बरें. अयोगोल आपल्या अधोगतींत क्षणोक्षणीं जास्ती वेगवान् व तेजःपुंज होत जातो, त्याप्रमाणें संविधानकानेंही झाले पाहिजे. एक विलक्षण कथाभाग प्रेक्षकांचे डोळे दिपवून अदृश्य झाला नाहीं तोंच त्याहूनही विलक्षण कथाभाग किंवा तत्पोषक अवांतर साधनें समोर आलीं पाहिजेत व शेवटीं वैलक्षण्याची परिसीमा झाली म्हणजे नाटकरूपी ऐंद्रजालिकानें आपली माया एकदम आवरून घेतली पाहिजे;नाहींतर प्रेक्षकांवरील ग्रह कमी होण्यास अवसर सांपडतो ------पात्रें व प्रवेश ही संविधानकाची अंगें होत. ... शेवटच्या प्रवेशांत संविधानकाची निरवानिरव करणें हें जितकें दुर्घटं आहें तितकेंच पात्रांच्या स्वभावांची छाप पहिल्याच भेटीस प्रेक्षकांवर पाडणें हें आहे.

वि. विस्तार-पु.३१ अंक :९-१०