पान:मनतरंग.pdf/६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भागात रस्त्याचे, वनिकीकरण प्रकल्पाचे काम मिळते. पण ते फारच थोड्यांना, दारिद्र्य कपड्यांतून... डोळ्यांतून क्षणोक्षणी जाणवत राहते.
 शाळेत भरपूर मुले होती. एका वर्गात आम्ही गाणे सांगितले. मी नजरेने मुले मोजली. पंचवीस मुली आणि तेवीस मुलगे. प्रत्येक वर्गात हेच प्रमाण. "दर, मुलामागे मिळणारे तीन किलो तांदूळ आणि मुलीला मिळणारा रोजचा रुपया याचा खूप आधार आहे या लोकांना." एक शिक्षक सांगत होते.
 माखला डांगात रोज एक बस येते. सायंकाळी एक बस खाली जाते. चुकून जरी बस चुकली तर दहा किलोमिटर्सचा उभा चढाव लागतो. दोन शिक्षिकाही नव्याने रुजू झाल्या आहेत. पण कोरकू माणसे इतकी चांगली की त्यांच्याकडून कधीच त्रास होत नाही.
 सरपंच सोमा कोरकू सांगत होता. "बाई, आता खूप बरे दिवस आहेत. पंधरा बरस पहेले धारणी, परतवाडाके बेपारी नमक लेकर आते. दो मटका शहद के बदले एक सेर नमक दे जाते. सागाका झाड तोडनके दो-चार रूपये. धूपकालने हम कैसे रहते क्या कहू ?..." या खेड्यात हिंदी समजते. मराठीचे वळण नाही. जवळच मध्यप्रदेश आहे. आता शाळेत जाणाऱ्या लेकरांना तांदूळ मिळतात. पोरींना जास्तीचा रोजी रुपया भेटतो. बस येते. रस्ता झालाय.
 "आम्हांला आठदहा लेकर होनार. त्यातली तीन चार बचनार. कुपोषणाने ती मरायचीच. आता साळा आली, बस आली, रेडू आला म्हणून सरकारला कळलं की शाळेतली समदी पोरं रोगट हाय ते. आता दोनचार सोडली तर सगळी पोरं गट्टू झालीत."
 सोमा बोलत होता. माझ्या मनात आले. हे आदिवासी म्हणजे या भारताची मूळ प्रजा. आदिकाळांपासून या देशात राहणारी माणसे, पण आमच्या 'सुसंस्कृत' होण्याच्या, नागर होण्याच्या हव्यासापायी आम्ही त्यांना सतत दूर लोटले. त्यांच्या मनाचे पापुद्रे उलगडून पाहण्याचा क्वचित प्रयत्न झाला असेल, पण त्यांना राष्ट्राच्या मध्यवर्ती धारेत आणण्यासाठी काय केले आम्ही ? आदिवासींना 'वनवासी' केले, सीतामाईला केले तसे. मग, भवतालची विलक्षण देखणी अशी रेशमी हिरवाई मनाला बाभळीच्या विखारी काट्यांगत टोचू लागते. एकच बोल घुमत राहतो-
 ...आदिवासींना आम्ही केले वनवासी. सीतामाईला केले तसे...

■ ■ ■

आदिवासींना आम्ही केले वनवासी.../६१