पान:मनतरंग.pdf/३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मैत्रिणीकडे जायचं नाही. मैत्री शाळेपुरतीच ठीक आहे. आपल्यावाल्यांशी मैत्री करावी' असे येताजाता कोण आपल्याला सांगते ?
 आणि म्हणूनच स्त्रीशिक्षण सर्वात महत्त्वाचे. आज महाराष्ट्रात काय परिस्थिती आहे स्त्रीशिक्षणाची ? जेमतेम ३२ टक्के स्त्रिया साक्षर आहेत. ६८ टक्के स्त्रिया निरक्षर, या ३२ टक्क्यांतील कित्येकींना केवळ सही करता येते म्हणून साक्षर म्हणायचे. ग्रामीण भागातील माता-पालकांचे प्रबोधन व्हावे, त्यांच्या दैनंदिन जगण्यातील अडचणी समजून घ्याव्यात, त्यावर मार्गदर्शन करावे, हा हेतू समोर ठेवून जिल्हा प्राथमिक शिक्षण प्रकल्पाचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणून महिला प्रबोधन प्रकल्पाची बांधणी झाली. हा प्रकल्प सुरुवातीला औरंगाबाद, परभणी, लातूर, धाराशिव, नांदेड या स्त्रीशिक्षणात अत्यंत मागास असलेल्या जिल्ह्यांत सुरू झाला. १९९८ पासून त्यात जालना, बीड, धुळे व गडचिरोली या चार जिल्ह्यांची भर पडली. या प्रकल्पास जागतिक बँकेकडून मदत मिळते. असे असले तरी या प्रकल्पाद्वारे कागदोपत्री महिला मेळावे भरल्याची नोंद आहे. काही प्रमाणात झाले आहेत. या महिलांच्यात जाणीव जागृत करण्यासाठी १० गावांतून एक महिला सहयोगिनी नेमली होती. तिला प्रवासभत्ता म्हणून पाचशे रुपये महिना प्रकल्पाद्वारे दिला जाई. परंतु या स्त्रिया संघटित होऊन अधिक प्रवासभत्ता मागतील या भयाने, शासनाने अवघ्या वर्षभरात हा अत्यंत दूरदर्शी आणि सर्वस्पर्शी कार्यक्रम बंद केला. वास्तविक पाहता या सहयोगिनी गावोगावी भेटी देत. पालकांना भेटत, शाळेत न जाणाऱ्या मुलांचे प्रश्न समजावून घेत. ज्यामुळे गावातल्या शेवटच्या 'आई' पर्यंत शिक्षणाचे महत्त्व, घरातील स्त्रीचे महत्त्व, दूरदर्शनवर काय पाहावे, काय पाहून नये, काय खावे इत्यादी अनेक विषय पोचत. परंतु मुळात शासनालाही 'आई' चे मुलाशी असलेले नाते कुठे कळले आहे ?

"माय आणि माती
दोघीही महान्
जग हे लहान, दोघीपुढे"

■ ■ ■

आई...पहिला गुरू / २७