पान:मनतरंग.pdf/३३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 समाजातील व्यक्तींना भवतालचा निसर्ग आणि मानवी समाज यांची नेमकी ओळख करून देऊन त्यांच्यावर सुखी, समृद्ध आणि शांतीमय जीवन जगण्याचे संस्कार करणारी महत्त्वाची दोन माध्यमे म्हणजे आई आणि गुरू. पहिली गुरू आईच असते.
 पानांची हिरवाई, आभाळाची निळाई, चमचमत्या चांदण्यात खेळणारा चांदोमामा, सिंहाला, माणसांनी टाकलेल्या जाळ्यातून सोडवणारा इटुकला उंदीर...या नि अशा अनेकांची ओळख आई करून देते. तिची काऊचिऊची गोष्ट-घरटे कसे बांधावे, ते स्वच्छ कसे ठेवावे, बाळाला आंघोळ कशी घालावी, घाण कशी करू नये...हे सारे शिकवते. 'आई' या शब्दाला, त्या व्यक्तीला समाजजीवनात सन्मान होता. 'मला माझ्या पित्याचे नाव माहीत नाही. मी जाबाली या मातेचा मुलगा सत्यकाम आहे' असे सांगणारा मुलगा 'आई' ने घडवला. संस्कार देण्याचे सामर्थ्य प्रत्येक आईला पिढ्यान्पिढ्या, आईकडून मिळत असे. अशा घरांतील आयांमध्ये वाचनातून, भवतालच्या संस्कारातून सामर्थ्य अधिक समृद्ध होई.

 परंतु 'आई' हे संस्कार देणारे समर्थ माध्यम गेल्या शेकडो वर्षांपासून

आई...पहिला गुरू / २५