पान:मनतरंग.pdf/२५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

कीड… आळ्या काढून, वाळलेली पाने वा फांद्या काढून त्या झाडांची निगा राखणाऱ्या 'नावडत्या राण्या' भेटतात. मग ती झाडेही त्यांना फळांचा भरभरून आशीर्वाद देतात. तात्पर्य एकच, झाड आणि स्त्रिया यांच्यातील पुरातन अनुबंध! मग ते झाड आवळीचे वा आंब्याचे असो वा महाकाय वटवृक्षाचे. मंगळागौरीसाठी लागणारी विविधप्रकारची पत्री असो, रंगबावरी फुले असोत वा हिरव्याकंच रेशमी तरीही धारदार दुर्वा असोत. हा अनुबंध… हे अतूट नाते हजारोवर्षापासूनचे आहे. स्त्रीने कंदमुळे… शाकभाज्या, शेतीतंत्र यांचा शोध घेतल्यापासूनचे आहे. आजही पेरणी करणारी स्त्री असेल तर बीज लवकर निसवून अंकुरते, अशी समजूत ग्रामीण भागात रूढ आहे.
 निसर्ग, स्त्री आणि भूमी यांच्या परस्पर साधर्म्यातून, मनोमय सायुज्यातून निर्माण झालेल्या विधी, व्रते, सणांतील स्त्रीचे प्रधानत्व… महत्त्व; समाजाच्या सांस्कृतिक विकासक्रमात कागदी...आणि वरवरचे होत गेले. ती व्रते पतीच्या दीर्घायुष्याच्या मागणीभोवती गुंतवली आणि गुंगवली गेली. ज्येष्ठात पाऊस अगदी क्षितिजावर येऊन उभा राहतो. मृगापूर्वीचा सैराटा सारखा कोसळणारा पाऊस वादळासह झलक दाखवून जातो. कर्नाटकात ज्येष्ठी पौर्णिमेला शेतात विधिपूर्वक नांगर घालून पेरणीपूर्वीची मशागत केली जाते.

 ज्येष्ठापासून पाऊसकाळ सुरू होतो. वैशाखात तापलेली जमीन पाऊसधारा झेलायला आसुरलेली असते. ज्येष्ठ पौर्णिमेची वटवृक्षपूजा ही मूलतः कृषिसमृद्धीचा यातुविधी असावा. वटवृक्षाच्या पारंब्या जमिनीत घुसतात आणि तेथून नवे झाड उगवते. वटवृक्षाची मुळे पावसाचे पाणी साठवून धरतात. वटवृक्ष पुरातनतेचे, विशालतेचे, सुरक्षिततेचे प्रतीक आहे. हा महाकाय वृक्ष वावटळींनाही अडवू शकतो. अशा वृक्षाची सामूहिकरितीने पूजा बांधून कृषिसमृद्धीची कामना या यातुविधीद्वारे केली जात असावी.
 भूमी ही जणू विश्वाचा गर्भाशय आहे. बीज पेरणारा सूर्य वैशाखात जमिनीला 'भगवती' करून जातो. तिच्या भेगांतून उष्णता…ऊर्जा पेरून जातो. पण त्याला 'वर्षा' ची साथ मिळाली नाही तर बीज कोरडे राहते. भूमीचा गर्भाशय वांझ राहतो. भूमी; वर्पन आणि सूर्य यांच्या समागमतून वनस्पतीसृष्टी निर्माण होते. मानवाचे अवघे जीवन अन्नावर अवलंबून असते. ते अधिकाधिक कसे निर्माण होईल यासाठी अदिमानवाने या तिहींतील नाते समजावून घेण्याचा प्रयत्न केला.

वृक्ष आणि स्त्री : आदिम नाते / १७