पान:मनतरंग.pdf/१६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

खानदेशातली तर हादगा-भोंडला, पुणे-सांगली-कोकणातला; तरीही या गाण्यात एवढा सारखेपणा कसा?
 असे म्हणतात की, स्त्रिया संस्कृतीच्या रक्षक आणि वाहक असतात. मुली... लेकीबाळी आपल्यासोबत ही गाणी, विधी जिथे जातील तिथे घेऊन जात असतात.

"तुळशीचं बाळ रोप
दुजा अंगणी रोवलं
मूळ...माती विसरुनि
मंजुळांनी डंवरल..."

 स्त्री वाढते एका घरात. तेथील संस्कार घेऊन सासरच्या घरात जाते आणि तेथे रुजून तुळशीसारखी मंजुळांनी बहरून जाते. दोन घरांतील, प्रदेशांतील संस्कारांचे सुंदर संतुलन स्त्री साधते. या स्त्रियांनी गाणी महाराष्ट्रभर नेली. ती एकमेकात मिसळून गेली. हादगा व भोंडला हा वर्षावाचा उत्सव. पाऊस पडला तर जमिनीतून धनधान्य उगवणार. जीवन म्हणजे पाणी. जगातील जीवनरहाटी चालू राहण्यासाठी हे 'जीवन' हवेच. आपल्याकडे एक म्हण आहे. 'पडला हस्त आणि शेतकरी झाला मस्त' भुलाबाई ही धरणीचे...भूमीचे प्रतीक. हा उत्सव जमिनीबद्दल... मातीबद्दल कृतार्थता व्यक्त करणारा उत्सव. ही धरित्री हजारो...लाखो वर्षे न थकता, न कंटाळता, अन्नधान्य, फळे फुले, कंदमुळे यांनी बहरते आहे. मानवी जीवन सुखकर करते आहे.
 आणि असे हे उत्सव कोणाचे ? तर कुमारिकांचे. कुमारिका, ज्या पाऊस, बीज झेलून नवनिर्मिती करण्यास योग्य झाल्या आहेत अशा मुली. नवनिर्मिती करण्याच्या ऊर्जेने रसरसलेल्या मुली. भारतीय संस्कृतीने या खेळोत्सवांच्या माध्यमातून कुमारिकांच्या सर्जनशक्तीचा केलेला हा सन्मान, आज जाणवलं की मन कृतार्थ होते. भारतातील विविध पारंपरिक सण, उत्सव या मागच्या घनगंभीर, मधुर भावसौंदर्याचा शोध कोणी घ्यायचा ? आम्हीच ना ? तेही आपल्या पायाखालची जमीन उकरून पाहू ना; त्यात अनमोल रत्नांचा खजिना भरला आहे.

■ ■ ■

यशस्वी होण्यासाठी.../१५९