पान:मनतरंग.pdf/१५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

व्यक्तीनेच सिद्ध करायचे की मी कशी वा कसा एकमेव 'योग्य' आहे. एक दिवस एक महिला कार्यकर्त्या दुसऱ्या जिल्ह्यातील तालुक्याच्या गावाहून खास मला भेटायला आल्या. पुरस्कारासाठी माझी शिफारस हवी होती.
 "ताई तुमची शिफारस कामाला येईल असं अनेकांनी सांगितलं मला. तुम्हाला पण चार-दोन बक्षिसं मिळालीत म्हणे. मग ही प्रोसेस तुम्हाला माहीतच असेल. तुम्ही ओळखलंत ना मला ? तुम्ही महिला मेळाव्यासाठी आला होता ना. तेव्हा अध्यक्षांची ओळख मीच करून दिली होती. पुरस्कार मिळाला तर तुम्हाला बोलवीन सत्काराला. मग देता शिफारस ? ताई शिफारस अगदी पक्की करून द्या बरका !" माझ्याजवळ काय उत्तर होते?
 दहा-बारा वर्षांपूर्वीची गोष्ट. मी आईला भेटायला गेले होते. एक दिवस सकाळी एक गृहस्थ आईची चौकशी करत आले. त्यांना काम विचारले. ते जिल्हा परिषदेतील कर्मचारी होते. या परिषदेला शासकीय पुरस्कारासाठी आईच्या नावाची शिफारस करावयाची होती. इतके फोटो, तितके फॉर्मस् ,एवढी शिफारसपत्रे वगैरे वगैरे...आणि मग सूचना, की ते पुण्याचे ढमके शासनात त्यांचे भक्कम वजन आहे. त्यांचे पत्र जोडले तर काम फत्तेच!
 आमचे संभाषण सुरू असतानाच आई आमच्यात घुसली नि आम्हाला सुनावले.
 "भाऊ कितव्यांदा येताहात ? यापूर्वी माझ्याकडे हे सारे मागितलेत. किती वेळा सांगू की पुरस्कारासाठी शिफारस मागायला जाणं माझ्या शिस्तीत बसत नाही. तुमच्या पुरस्कारासाठी का गेली पंचवीस वर्षे मी काम करते ? किती वेळा सांगायचे की माझ्या समाधानासाठी खुशीसाठी करते. शासनाच्या गौरवाने मी खुश होऊ ? आम्ही याला लबाडी म्हणतो. कृपा करून यासाठी पुन्हा येऊ नका." मी योग्य वाटले तर मला न विचारता पुरस्कार द्या ना ! 'देणेघेणे' सारखा हा काय व्यवसाय आहे ?"
 आई घरात गेल्यावर त्या गृहस्थांनी आपले मन मोकळे केले,
 "ताई, तुमच्या आईच या पुरस्कारासाठी योग्य आहेत असे आम्हांला मनापासून वाटते. शासनाचा कारभार म्हणजे नुसता कागदी घोड्यांचा व्यवहार आहे. ही कागदपत्रे आणा, ती प्रशस्तीपत्रे जोडा आणि खोटी कागदपत्रे सादर करणाऱ्या सर्वस्वी अपात्र व्यक्ती हे पुरस्कार ओढून नेतात. ते पाहवत नाही.

मनतरंग / १४५