पान:मनतरंग.pdf/१५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



 'ताई, मत कोणाला देणार ? कोणकोणते उमेदवार आहेत ? बायांपैकी आहेत का कोणी ?" एक राज्यशास्त्राची विद्यर्थिनी निवडणूकपूर्व परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बाजाराला आलेल्या भाजीवालीला प्रश्न विचारीत होती.
 "कसलं मत हो ताई ? पुन्ना मताची वारी आली का? मागल्या सालीच टाकलं होतं की ! आन् ह्ये बगा, आमी ल्योकाला न्हाईतर मालकाला इचारतो की कच्च्या चित्रावर शिक्का हाणायचा. पयलं दोगंबी एकच चित्र सांगायचे. आता ल्योक म्हणतो घड्याळ तर बाप म्हणतो फूल आन् सासरा म्हणतो 'हात'च बरा, बघा ही नवी रीत. तुमीच सांगा वो कोनचं चित्र बरं होय?" ती तरुण कार्यकर्ती गोंधळून गेली आणि पुढे सरकली.
 रिक्षा चालवणाऱ्या दादांना सहज विचारलं "कुणाचा जोर आहे यंदाच्या निवडणुकीत?" तो रिक्षावाला मनापासून हसला आणि टोमणा देत मला म्हणाला, "आत्ता, तुमी मला इचारता ? आवं तुमीच म्हंता की बायांना निवडून दिलं तर भ्रष्टाचार कमी व्हईल. पन आपल्याला न्हाय पटत बुवा ! आपल्या बाया राज चालवाया लागल्या तर, पोळ्या भाकऱ्या कुनी भाजायच्या ? समदेच उपाशी ऱ्हात्याल की ! एकांदुसरी पाटवली तर निभतंय की!" रिक्षावाल्याचे उत्तर.

मनतरंग / १४२