पान:मनतरंग.pdf/१२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

चालावे. स्त्रिया सोशीक असतील तरच घर सुखी राहते. थोडे फार शिकलेल्या, घाम गाळून घरासाठी पैसे मिळविणाऱ्या या पोरींना ही शिकवण बोचत राहते. आम्ही पुरुषांइतकेच कष्ट करतो. घरासाठी चार पैसे मिळवतो. मग आम्ही मार का खायचा? अपमान का सोसायचा? रोज दारू पिऊन येणाऱ्या व मुलांदेखत त्यांच्या आईला गुरासारखे बडवणाऱ्या बापाला शांता.. पल्लवी अडवते आणि चार शब्द सुनावते. त्या क्षणी बापाच्या नजरेत उमटलेला संताप, तुच्छता तिला अस्वस्थ करते. या काळात त्यांच्यातली पार्वती हिचा विवाह होतो. मधुर स्वप्नांचे नाचरे सूर ओंजळीत घेऊन पार्वती सासरी जाते. हुंड्यातील न दिलेल्या रकमेसाठी तिचा सतत छळ होतो. बापाकडे पैसा नाही. सासरी मार आणि उपासमारीचा मारा. अवखळ, गोड, गुणगुणत चालणारी पार्वती, या त्रासाला कंटाळून स्वत:ला पेटवून घेते. तिच्या या अघोरी मृत्यूची जखम शांताचे मन सोलून काढते. आता फक्त तिघी मैत्रिणी उरतात. रानातील एकाकी रस्ता या सैरभैर मुलींना बोचू लागतो. त्यांच्यातला मनमोकळेपणा हरवून जातो. गावातल्या तरूण टवाळांचे टोळके कायम झाडाखाली पत्ते खेळत, बिड्या ओढत बसलेले असते. या बेकार पोरांचा उद्योग एकच, स्त्रियांची छेड काढणे. त्या टोळक्याचा म्होरक्या या मैत्रिणींची उद्धटपणे छेड काढतो. शांता खाड्कन् त्याच्या थोबाडीत मारते. एका मुलीने, भर रस्त्यात, मित्रांसमोर केलेल्या अपमानाने उखडलेला तो 'दादा' मित्रांना हाताशी धरून एक दिवस कामावर चाललेल्या शांताच्या व मैत्रिणींच्या अंगावर दारूची बाटली रिकामी करतो आणि गावात अफवा उठवतो की या तिघी दारू पितात, आणि त्यांचे पुरुषांशी संबंध आहेत. या मुलींची निरागसता जाणणारा, त्यांना मदत करणारा नावाडी या अफवेला बळी पडतो. त्या संध्याकाळी या मैत्रिणींना पल्याड पोचवताना त्यालाही दारूचा वास आलेला असतो. पाण्याने अंग धुतले तरी कपड्यांचा वास कसा जाणार ? घर, गाव समाज... या सर्वांपासून एकाकी पडलेल्या तिघी निराशेने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतात, शांता, लक्ष्मी कधीच परत न येण्यासाठी समुद्रात शिरतात पण श्रीदेवीला मात्र धीर होत नाही. या दोघींचे निरागस, निष्प्राण देह पाहून गाव जागे होते. श्रीदेवी धाई धाई रडून सर्वांसमोर सत्य ठेवते. गाव पस्तावते. शांता-लक्ष्मीच्या मृत्यूनंतर गावाला मुलींच्या कोवळ्या आणि निरपराधी तना-मनाची साक्ष पटते.

गोरे पान उरी केळीचे फाटते.../ ११९