६०
आईचें खायचें तयार करायला लागलें. रत्नुपुढें दुपारची दशमी - आणि लोणी ठेवायला लागलें, तर तो ऐकेना. त्याला वाटे कीं कालच्या या नव्या ताईनें आपल्या करितां कांहीं तरी खायला आणले आहे, तें द्यावें.- पण त्याच्याकडे जरा रागाने बघतांच, तो मुकाट्यानें पुढे ठेवलेली दशमी खायला लागला. बबूताईला विचारले की " चहा करूं या का ? "
"कशाला ? " बबूताईने मलाच उत्तरात्मक प्रश्न केला.
" प्यायला ! चहाचा दुसरा कसला उपयोग आहे ?" मी जरा विनोद करण्याचा प्रयत्न केला.
" तसे नव्हे ! मी म्हणत होतें, कीं आतां आपण दोघीजणी आमच्या बंगल्यावर जाऊं -तिथेंच चहा घेऊं ! म्हणून म्हटलें इथे कशाला ? -” बबूताईनें आपला हेतु व्यक्त केला.
"मग काय ? आमचा 'चहा' घेणार नाहींसच तर !-"
" मी असें म्हटलें आहे का पण ? - पण म्हटले दोनदां चहाचें काय कारण ?"
"बरें तर ! इथेंच घेऊं ! तुझ्या तिथला नाहीं घेतला म्हणजे झालें !”
"बरें तुझ्या मनासारखे होऊ दे !"
"मग चलूं या तर आमच्याकडे ! आई, सुगंधाताईला आमच्याकडे घेऊन जाऊं का ?–लवकर परत आणून पोंचवीन !" बबूताईनें आईची परवानगी विचारिली.
"बबूताई, तुझ्या बंगल्यावर आजच कशाला येऊं १-" मी विचारलें
.
" मी तुझ्याकडे काल आज कशाला आलें ?" बबूताईनें प्रश्न केला. "
" कशाला म्हणजे उगीचच !"
"मग झाले तर ! - उगीचच तूं माझ्याकडे चलायचें आहेस ! -मैत्रिणी मैत्रिणी एकमेकींकडे कशाला जात असतात ! - तूं माझी मैत्रीण आहेस ना ?--मग चल तर माझ्या बरोबर !"
" बबूताई, मला श्रीमंतांच्या इथें जायचे कसेसेच वाटतें ! " माझें वाटणें मी सांगितलें.
" हें काय सुगंधाताई, मी आमची श्रीमंती का तुला दाखवायला नेतें ? "