पान:भूमी आणि स्त्री.pdf/२६८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

जातो. रोटविधी मात्र श्रावणातील नागपंचमीनंतरच्या कोणत्याही रविवारी साजरा करतात. तिरतची कानबाई हा नवसाविधी जातीची बंधन तोडून, पूर्ण गाव एकत्र येऊन मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. मराठवाड्यात कानबाईचा विधी नाही. खानदेशातील काही घराणी मराठवाड्यात स्थायिक झाली आहेत. मात्र हा विधो करण्यासाठी ही मंडळी आपल्या मूळ गावी जातात. कोकणस्थ समाजात विवाहानंतर देवीच्या नावाने बोडण घातले जाते. त्याप्रमाणे खानदेश, जळगाव, नाशिक, धुळे या अहिराणी भाषा बोलल्या जाणाऱ्या भागात विवाहानंतर कानबाईचे रोट केले जातात.
 तिरतच्या कानबाईजवळ प्रथम कानबाई-कन्हेर यांचा विवाह लागतो. नंतर ज्या घराने या उत्सवाची जबाबदारी घेतलेली असते त्या घरातील मुलामुलींची लग्ने लागतात. त्यानंतर आसपासच्या गावांतील लोक येथे येतात व सामुदायिक लग्ने लागतात. जातीचे बंधन नसते. एकेका दिवशी दोनशे अडीचशे विवाह लागतात. हा उत्सव सात दिवस तर काही ठिकाणी सव्वा महिना चालतो. या वार्षिकोत्सवात स्थापना, कानबाई -कन्हेर विवाह, गवरनी पूजा, भोजन, जागरण आणि विसर्जन हे विधी महत्त्वाचे मानतात. ही देवता माघ, चैत्र वैशाखात आणि मंगळवारी वा शुक्रवारी मांडतात. त्याचे उल्लेख गीतात येतात.

चैत्र वैशाखाना ऊन व माय, वैशाखाना ऊन
खडके तापून झाले लाल व माय; तापून झाले लाल

 या उन्हाने कानबाईच्या पायाला फोड आले आहेत. ती अशा उन्हात धवया... शुभ्र घोड्यावर बसून येते.

म्हावना महिना म्हावना महिना, दिन मंगयावार व।
कानबाई मायनी बैठक दिनी, दिनी शुक्रवार व।

 माघ महिन्यात रथ सप्तमी असते. कानबाईच्या स्थापनेसाठी राणादेवाच्या लग्नात वा तिरतवरून परणून आणलेला नारळ आवश्यकच असतो. या पूजेसाठी आवश्यक असणारा बिजोरा व फुले, दिवठाणी व चौरंग, कानबाईची प्रतिकृती,

भूमी आणि स्त्री
२६३