पान:भूमी आणि स्त्री.pdf/२५४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

अत्यन्त जपून न्यावी लागतात. सुगडे वेशीत फुटणे अशुभ मानले जाते. या परिसरात असे मानले जाते की महार स्त्रीच्या हातून वेशीत सुगडे फुटले म्हणून तिला हळदीकुंकू लावून वाण देत नाहीत आणि मांग स्त्रीला मात्र आवर्जून गाठले जाते व तिला वाण वंसले जाते. ही प्रथा मराठवाड्यात ऐकली. अर्थात ती सर्वत्रच असेल असे नाही. सुगड्यातील तांदूळ, टहाळ, बोरे इ. बीजरूपी१९ सूर्याचे प्रतीक असावेत.
 पेरणी, इळाआवस, ढवारा शेतीशी निगडित विधींत मांग समाजाच्या व्यक्तीला विशेष मान असतो. महाराष्ट्रात संक्रान्त सणास तिळगुळास विशेष महत्त्व असले तरी हा सण दक्षिणेत विशेष उत्साहाने आणि भूमीच्या सुफलतेशी जोडून साजरा होतो. आंध्रात ज्येष्ठी पौर्णिमेचा एरुवाक् हा सण शेतीच्या उद्घाटनाचा तर संक्रान्ती हा समारोपाचा असतो. या वेळी कापणी होऊन धान्य घरात आलेले असते. साळीचा दुसरा हंगाम संपलेला असतो. ज्या चांद्रमासात सूर्याचे मकरसंक्रमण होते तो पौष महिना पहिले मकरसंक्रमण होते तेव्हा उत्तरायण सुरू होते. दुसरे कर्कसंक्रमण दक्षिणायनाचा आरंभ सूचित करते. महाराष्ट्रात संक्रान्तीला मुली मुगाची डाळ व तांदूळ एकत्र करून एकमेकींकडे जातात. प्रत्येकाच्या घरी पाट मांडलेला असतो. त्यावर ते मिश्रण मूठमूठ ठेवतात. तिळगुळ घेऊन वडील माणसांना अभिवादन करतात. राजस्थानात या दिवशी सकाळी सुस्नान होऊन देवीला जाऊन तिला वाणवसा देतात. राजस्थानात देवीसमोर वाणाच्या १३ वस्तू ठेवून पूजा केली जाते. नंतर त्या सवाष्णींना देतात. त्याला 'तेरुंडा' असे म्हणतात. महाराष्ट्रात विवाहनंतरच्या पहिल्या वर्षी नारळाचे वाण देतात. नंतर हळदीकुंकू, हिरव्या बांगड्यांचा चुडा अशा सौभाग्य वस्तू वाण म्हणून देण्याचा रिवाज आहे. आंध्रात संक्रान्तीला मुली शेणाचे गोळे करुन त्याला हळदीकुंकू वाहतात. त्याला फूल खोचतात. ते गोळे रांगोळीवर ठेवून भोवती फेर धरून नाचतात. त्याला गोब्बम्मा म्हणतात. संक्रान्तीच्या दुसऱ्या दिवशी शेतकरी गोठा साफ करतात. गुरांना सजवतात. नव्या धान्याची खिचडी खातात.
 संक्रान्तीचे शेतीशी असलेले नाते महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात फारसे जाणवत नाही. जे जाणवते ते मिसळीची भाजी, खिचडी, तिळगुळाच्या तेलाच्या, भाकरी या अन्नप्रकारातून. या दिवशी ५ सुवासिनीस गहू, तीळ कापूस, उसाचे कांडे घालून

भूमी आणि स्त्री
२४९