पान:भूमी आणि स्त्री.pdf/२५५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

सुगडी देतात. या प्रथेतील सुगड मातीचे असून ते कुंभाकार असते आणि कुंभ हा सुफलतेचे प्रतीक आहे.
 दक्षिणेत.... तामिळनाडूत यालाच पोंगल म्हणतात. भोगीला वर्षाऋतूचा देव इंद्र याची पूजा असते. संक्रान्तीला सूर्य पोंगल असे म्हणतात. दूधतांदूळ शिजवून 'पायसम्' करतात. 'पोंगल पोंगल' असे ओरडून खिर शिजली का असे एकमेकांना विचारतात. एकमेकांना शुभेच्छा देतात. महाराष्ट्रात आम्ही 'तिळगूळ घ्या आणि गोड बोला' असे म्हणून शुभेच्छा देतो. प्रेम द्या प्रेम घ्या हे सांगणारा हा सण आहे. मकरसंक्रान्तीचे वाणवसा लुटणे, हळदीकुंकू समारंभ करणे रथसप्तमीपर्यन्त चालते. रथसप्तमीला रथात बसलेल्या सूर्याची पूजा केली जाते. रथसप्तमी महत्त्वाचे व्रत मानले जाते. मानवी जीवनाच्या विकासाचे पर्व सुरू झाले तेव्हापासून मानवी जीवनास सुखमय करणान्या तीन देवतांची पूजा होते. वर्षनाची देवता इंद्र, प्रकाश देणारा सूर्य आणि सर्जनातून अन्नसमृद्धी देणारी भूमी या त्या तीन देवता. रथसप्तमीला व्रतस्थ राहून सूर्यपूजा केली तर आरोग्य लाभते असे लोकमानस मानते. बावचा नावाची शेतात सापडणारी वनस्पती वाटून ती डोक्याला लावून संक्रान्तीला नाहतात. महाराष्ट्रात सात अश्वांचा रथ रांगोळीने काढून त्यात सूर्यनारायण बसले आहे असे दाखवितात. त्या प्रतिमेची पूजा करतात. या दिवशी गव्हल्याची खीर करतात या व्यतिरिक्त महाराष्ट्रात ती वेगळ्या रीतीने साजरी केली जात नाही. सूर्यपूजा इराणमधून शकहूणांकडून भारतात आली असे मानतात. श्रीकृष्ण पुत्र सांब याला कुष्टरोग होता. सूर्यपूजा करण्याचे त्यास सांगितले होते. सूर्यपूजा करण्यासाठी त्याने शाकद्वीपातून मग नावाचे ब्राह्मण आणविले होते. वराह मिहिर हा मग ब्राह्मण होता. रथसप्तमीला संक्रान्त सणाची समाप्ती होते.
 होळी : हुताशनी पौर्णिमा -
 फाल्गुनातील वसंतोत्सव -
 फाल्गुन पौर्णिमेला हुताशनी पौर्णिमा म्हणतात. फाल्गुन हा दक्षिणेत शेवटचा महिना मानला जातो. चैत्रप्रतिपदा हा वर्षारंभाचा पहिला दिवस फाल्गुन कृष्ण प्रतिपदेस वसन्तोत्सवाला प्रारंभ होतो. पंचमीला रंगपंचमी असते. फाल्गुन महिन्यास

२५०
भूमी आणि स्त्री