पान:भूमी आणि स्त्री.pdf/२२३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 पण माहेर म्हटले की तिचा जीव गलबलून जातो. भाऊबीज आली की तिचे डोळे भावाच्या वाटेकडे लागतात.

दिवाळीच्या दिशी ओवाळित बंधु तुला
तुज्या शेल्याची चोळी मला ....
सोनसळे गहू रवा काढते दाणेदार
धाकला बंधुराया आज फेण्या जेवनार ....
पिंपळपानांची सावली पड़े जोत्यावरी
भाचा मामाचे कडेवरी ....

 भाऊबीज महाराष्ट्रात अत्यन्त भावुकतेने साजरी होते. राजस्थान, उत्तर, मध्य प्रदेशात राखीपौर्णिमेचे वा भाई पांचचे महत्त्व ते महाराष्ट्रात भाऊबीजेचे.धावतपळत भाऊ भाऊबीजेला बहिणीचे घर गाठतोच. न आला तरी ती रागवत नाही. चंद्राला ओवाळते व भावाला आयुष्य चिंतिते.

भाऊबीजेच्या दिशी ओवाळीलं चांदाला
दूरदेसीच्या बंधवाला आयुख चिंतिते ....

 हे खरे असले तरी तिला जाणीव असते.

माय तो माहेर, बाप तो येऊजाऊ
पुढे नेतील ग भाऊ, लोकलाजे...
आई बापाच्या राज्यात खाल्ल्या दुधावरच्या सायी
भावजयींच्या राज्यात ताक घेण्याची सत्ता नाही.

 बहीण भावाचे नाते नितान्त निरामय आणि आंतरिक नात्याने ओलावलेले असते.

बहीण भावाचे प्रेम ते शुद्धबुद्ध
अपुरे होती शब्द वर्णावया
दुबळा पाबळा भाऊ बहिणीला न्यारा
पुनवेच्या दिशी चंद्र मोहरला प्यारा
बहिणीला भाऊ कसा रागावेल ?
चंद्र आग का ओंकेल काही केल्या....

२१८
भूमी आणि स्त्री