पान:भूमी आणि स्त्री.pdf/१९२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

खिचडी, सार, भाजी व लाडू, करंज्या आदी फराळाचा एक नैवेद्य असतो. सायंकाळी पुरणपोळी आणि पंचपक्वान्नांचे जेवण असते. पुरणावरणाचे महत्त्व असतेच. जेवणात सोळा भाज्या, सोळा चटण्या, कोशिंबिरी, कढी, भात असतो. साखरभातही करतात. ही लक्ष्मी अन्नदा, अन्नाची विपुलता देणारी म्हणून भरपूर पदार्थ करतात.

आली आली लक्ष्मी
आली तशी जाऊ नको
बाळाला सांगते
धरला हात सोडू नको
मला आहे हौस
चांदीच्या ताटाची
लक्ष्मीच्या नैवेद्याला
मूद साखरभाताची

 लक्ष्म्यांसमोर दिवे असतात. ज्वारीची उकड काढून दिवे करतात. काहींकडे कणकेचे वा पुरणाचे करतात. बहुतेक घरांतून ज्येष्ठेपुढे सोळा दिव्यांची तर कनिष्ठेपुढे आठ दिव्यांची आरती असते. ब्राह्मणेतर घरांतून दोघीपुढे सारख्याच पोळ्यांचा, ५ वा ८ पोळ्यांचा नैवेद्य असतो. कुसुमताई देशमुख, औरंगाबाद यांच्या घरी ज्येष्ठेपुढे दोन आणि कनिष्ठेपुढे १ पोळीचा नैवेद्य असतो. काही घरांतून आंबिल करतातच. ज्वारी हे मराठवाड्यातील महत्त्वाचे धान्य. त्याचे पीठ शिजवून ते ताकाला लावतात. मीठ लसूण वाटून त्यात घालतात. शेतीशी संबंधित विधींत आंबिल करण्याची प्रथा आहे. आंबिल अतिशय चविष्ट असते.
 पोवते ऊर्फ दोरे घेणे -
 लक्ष्म्यांची आरती करताना दुसऱ्या दिवशी दोरा हळदीच्या पाण्यात भिजवून त्याचे १६ पदरी व ८ पदरी पोवते तयार करतात. ते लक्ष्म्यांना वाहतात. १६ पदरी पोवते लक्ष्म्यांना व ८ पदरी पुढील मुलांना वाहतात. घरात जेवढी माणसे तेवढे पोवते तयार करतात. त्याला गाठी देतात. ते तिसऱ्या दिवशी गळ्यात घालतात. मराठा समाजात दोरे गळ्यात धालीत नाहीत. दुसरे दिवशी हळदकुंकवाच्या पाण्यात

भूमी आणि स्त्री
१८७