पान:भूमी आणि स्त्री.pdf/१७१

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 इतर प्रांतांतील अंबुवाची उत्सव -

 वरील माहितीवरून असे लक्षात येते की पंचमीचा काळ हा महाराष्ट्रात पाळला जाणारा भूमीचा रजउत्सव असावा. कारण तिसऱ्या दिवशी भुलोबा उभा करतात. त्याचा आकार पुरुष लिंगासारखा असतो. तो मातीचा करतात. त्याला धान्य लावून सजवतात व पूजा करतात. स्त्री रजस्वला झाल्यानंतर पुरुष समागमफलदायी असतो. काश्मीरमध्ये चैत्र कृष्णपंचमी ते अष्टमीपर्यंत पृथ्वी रजस्वला असते. अष्टमीला चौथ्या दिवशी ती शुद्ध होते. या व्रतास 'राज्ञीस्नापन' म्हणजेच 'राणीचे न्हाण' असे म्हणतात. केरळमध्ये या उत्सवास 'उछारल' असे म्हणतात. हा उत्सव जानेवारी-फेब्रुवारीत मकरम् महिन्यात पाळला जातो. शेतीचा हंगाम संपलेला असतो. धान्यागरांना केरसुणीचे फडे लावून बंद करतात. तीन दिवस दार उघडत नाहीत. धान्य विकणे, अंगण, बागांची झाडझूड करणे, सारवणे, झाडे शिंपणे आदी क्रियाबंद ठेवतात. केरसुणी हे लक्ष्मीचे प्रतीक आहे. शेतीची अवजारेही धान्यगारांजवळ बंद करतात. त्यांना स्पर्श करीत नाहीत. चौथ्या दिवशी भूमीशुद्ध झाल्यावर टोपलीभर पाने शेतात नेऊन खतात मिसळतात व शेताची भाजणी करतात. कामरूप ऊर्फ आसामात हा उत्सव अत्यन्त थाटात साजरा होतो. मातीच्या घटात धान्यबीज आणि पाणी घालून ठेवतात. अंबुवाची काळ संपताच तो घट नदीत सोडतात. आज हा उत्सव कामाख्या देवीच्या उपासनेशी जोडलेला असला तरी, त्याचे मूळ रूप कृषिसंबद्ध आहे. ते आजही टिकून आहे. ओरिसात तर या सणाला सार्वत्रिक सुट्टी असते. पहिल्या दिवसाला पहलिरज म्हणतात. यादिवशी नववधू, कुमारिका पहाटे उठून स्नान करतात. पायात खडावा घालतात. तीन दिवस रजस्वला.. शिवायचे नसलेल्या धरणीला स्पर्श करीत नाही. गल्ली वाडीतील स्त्रिया एकत्र जमून हिंदोळ्यावर झुलत गाणी म्हणतात. तीन दिवस फलाहार करतात. या काळात नववधूंना माहेरचे लोक भेटवस्तू देतात. कुमारिकांना नवे कपडे आणतात. पाला नामक लोकनृत्याने गाव रुमझुमत असते. केरळ, आसाम, ओरिसा, बंगाल या प्रान्ताप्रमाणे हा उत्सव साजरा करण्याची पद्धत महाराष्ट्रात मराठवाड्यात नसली तरी नागपंचमी सण साजरा करण्याच्या पद्धतीवरून हा सण जमिनीच्या सुफलीकरणाशी अत्यंत जवळिकेने जोडला असल्याचे जाणवते. कोकण, कोल्हापूर भागात भाताच्या लावणीपूर्वी सात नावाचा विधी साजरा केला जातो. सात म्हणजे शांत जणु पृथ्वीची शान्ती केली जाते.

१६६
भूमी आणि स्त्री