________________
प्रकरण एकवीसावे . उपसंहार येथपर्यंत आपण हिंदुस्थानांत स्वराज्य स्थापन होऊन ते टिकाऊ होण्यासाठी काय केले पाहिजे हे पाहिले. पण ही गोष्ट साध्य कशी करावी है कोठेच सांगितले नाही. याचे मुख्य कारण या बाबत अनेक मतभेद होतील. जो तो मनुष्य आपआपल्या हिमतीप्रमाणे व परिस्थितीप्रमाणे हे काम करणार व प्रत्येकाला तसे करण्यास पूर्ण सवड पाहिजे. हे काम सगळ्यांचे आहे. यांत यश आले तर सगळ्यांचाच फायदा आहे, हे न केले तर सगळ्यांचेच नुकसान आहे. यासाठी पुष्कळ लोक जे मनांत व अचरणांत आणतील त्याप्रमाणे नफा अगर नुकसान होणार आहे. झटणारी, आळशी व विरुद्ध जाणारी किंवा झटणारी व न झटणारी या माणसांची संख्या जशी लहान मोठी असेल त्याप्रमाणे हे काम होणार आहे व यासाठी लोकजागृती करणे, लोकांना कामाला लावणे, काम करणाऱ्यांना योग्य वळण देणे हे काम पुढारी म्हणविणारांचे आहे. परमात्मा जसा सर्वव्यापी, निर्गुण, निराकार, मायावी पण आपल्याच शब्दाने बांधलेला आहे त्याचप्रमाणे सरकार व जीव या संस्था देखील त्या त्या शरीरापुरत्या सर्वव्यापि, निर्गुण, निराकार, मायावी वगैरे आहेत. परमात्म्याबद्दल विचार करू लागल्यावर तो जसा पांच घरांत (पंचायतनांत) दृष्टीस पडतो त्याचप्रमाणे सरकार देखील पांच ठिकाणी व जीवहि पांच ठिकाणी अनुभवास येतो, सरकारच्या अनुभवास येण्याच्या पांच जागा म्हणजे (१) राजा किंवा तत्सदृश ऐश्वर्यपूर्ण लोकांची संस्था, (२) मध्यवर्ति प्रातिनिधिक संस्था, (३) प्रांतिक प्रातिनिधिक संस्था, (४) स्थानिक प्रातिनिधिक संस्था व (५) ग्रामसंस्था या होत, या पांच जागा परमेश्वराच्या अद्वितीयत्व, सर्वज्ञत्व, सर्वशक्तिमत्व, दयालुत्व व न्यायित्व या स्वरूपांना सदृश आहेत व या नांवावरून त्या त्या संस्थांच्या