________________
संघस्थापना अशा मिश्र पद्धतीमुळे देश दोन्ही प्रकारच्या संस्थांच्या फायद्याला मुकला. पण दोन्ही प्रकारांतील तोटे मात्र त्याला सहन करावे लागले. याशिवाय राज्यकर्ते हिंदुस्थानांत रहात नाहीत, त्यामुळे दोघांचे सुखदुःख एक नाही. दोघांचे हितसंबंध निरनिराळे पडतात व या हितसंबंधांचा विरोध तर या देशाला पावलोपावली नडतो. जपान केवळ पन्नास साठ वर्षांत जगांत सर्वमान्य झाले व दीडशे वर्षांत हिंदुस्थान मातीमोल झाले याचे कारण हे होय, राज्यकर्ते परकी असले तरी ते या देशांत रहाते तरी इतके नुकसान झाले नसते. पण ते लांब राहून या देशाचे जास्त अकल्याण करतात, जपानांत जपानी लोकांची राजसत्ता असल्याने प्रत्येक गोष्टींत राजसत्तेचा त्यांना पाठिंबा मिळाला. प्रजातंत्र देशांशी टक्कर देण्यास प्रजातंत्र राजपद्धति पाहिजे म्हणतांच ती तेथें अमलांत आली. राज्यघटना अशी बदलतांच सगळ्या समाजाची दुसरी घडी झाली, व सर्व व्यवस्था सुयंत्र चालली. फिलीपाईन बेटांत पूर्वीची व्यवस्था नसल्यामुळे तेथें नवी व्यवस्था स्थापन करणे सोईचे झाले, पण हिंदुस्थानांत एक पद्धत अंमलांत असतांना ती मोडून दुसरी स्थापण्यास परकी सरकारला फार अडचणी येतात, येथील नोकरशाही राजतंत्री छापांत इतके दिवस पडल्यामुळे तिचा पूर्वांचा आकार मोडून नवीन आकार देण्यास जास्त अडथळे येतात. नोकरशाही राजाप्रमाणे सर्वस्वी स्वतंत्र व ती प्रजातंत्र पद्धतीप्रमाणे नेहमी बदलणारी! यामुळे एकाहि पद्धतीचा फायदा हिंदुस्थानास मिळाला नाही. हिंदुस्थानासारख्या अफाट देशा वी घटना करावयाची म्हणजे ती संयुक्त संस्थानांच्याच पद्धतीवर केली पाहिजे हे उघड आहे, हिंदुस्थानांत अनेक भाषा, अनेक पोषाख, अनेक धर्म, अनेकविध रिवाज व अनेक जाती असल्यामुळे निरनिराळे भाग स्थानिक व्यवहारापुरते स्वतंत्र ठेवून इतर बाबींत त्यांची एकत्र जोडणी केली पाहिजे. ही जोडणी मात्र सर्व भागांचे हितच व्हावे अशी केली पाहिजे. अमेरिकेसारखी संयुक्त संस्थाने व हिंदुस्थान यांत एक मोठा भेद आहे तो हा की, येथे अनेक धर्माची खिचडी आहे; ती अमेरिकेंत नाही व अशी खिचडी होऊ नये म्हणून प्रत्येक जण हल्ली जपत आहे. हिंदुस्थानाचे अठरा निरनिराळे भाग इसवी सनापूर्वी पासूनचे आहेत. पण त्यावेळी परधर्मी लोकांची भेसळ नव्हती