पान:भारतीय लोकसत्ता.pdf/४४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४४५
उपसंहार

 १५ ऑगस्ट १९५२ या दिवशी स्वातंत्र्यदिनाच्या निमित्तानें अध्यक्ष राजेंद्रबाबू यांनी जे भाषण केले त्यांत एकच संदेश होता. 'चारित्र्य संपादन करा.' खरोखर या एकाच संदेशाची भारताला जरूर आहे. आपण माणूस म्हणूनच कमी पडत आहे. सार्वजनिक नीतिमत्ता, कार्यक्षमता, उद्योगशीलता, उत्तरदायित्व, दक्षता, समाजहितबुद्धि या गुणांच्या दृष्टीनें जपानी माणूस, इंग्लिश माणूस, अमेरिकन माणूस हा हिंदी माणसापेक्षा पुष्कळच उंच पदवीवर आहे. ती उंच पदवी हेच चारित्र्य. जमिनीची मशागत करून तिचा कस वाढविण्याचे या देशांत जसे प्रयत्न चालू आहेत त्याचप्रमाणे माणसाच्या मनाची मशागत करून त्याचा कस आपण वाढविला पाहिजे. तो वाढला तर लोकशाहीला अवश्य ती साधनसामुग्री व समृद्धि आपणांस उपलब्ध होऊन राममोहनरायांच्यापासून टिळक, महात्माजी, सुभाषचंद्र यांच्यापर्यंत अनेक विभूतींनी ज्या एकाच ध्येयासाठी आयुष्य वेचलें तें ध्येय साध्य होईल.



प्रकरण सोळावें
उपसंहार


 आज जग एका क्रान्तिरेषेवर उभे आहे. त्या रेषेच्या कोणच्या बाजूला त्याचें पाऊल पडेल, यावर त्यांचे भवितव्य अवलंबून आहे. आणि हे भवितव्य ठरविणे भारतीयांच्या हाती आहे. आजपर्यंतच्या इतिहासांत जगाचें भवितव्य ठरविण्याचा हा मान कालपुरुषाने असा एकट्या एक देशाच्या हात कधी दिला नसेल. भारताला आज तो प्राप्त झाला आहे. त्या सन्मानाला आपण पात्र आहोत की नाहीं है मात्र ठरावयाचे आहे. कालपुरुषानें एक असामान्य जबाबदारी आपल्या शिरावर टाकून आपली सत्त्वपरीक्षाच चालविली आहे.
 जगांत आज लोकायत्त शासनानें आपलें राजकारण चालविणारी, लोकशाहीवर खरी श्रद्धा असणारी दोनच राष्ट्रे आहेत. ब्रिटन व अमेरिका.