पान:भारतीय लोकसत्ता.pdf/४२८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
४२७
मानवपुनर्घटना

आणि पुष्कळशा पाटबंधाऱ्यांच्या योजना म्हणजे विनोदप्रकरणेंच होतीं.' (टाइम्स ऑफ इंडिया २५- ११- १९५०)
 भिन्नभिन्न प्रांतांतल्या नियोजनांच्या अपयशाची जी कथा वर सांगितली. तशीच रडकथा केन्द्रसरकारच्या आर्थिक नियोजनाची आहे, हे स्वतः पंडितजींनींच सांगून टाकलेले आहे. प्रांतांचे प्रधानमंत्री व काँग्रेसचे प्रतिनिधि यांचेपुढे भाषण करतांना जवाहरलालजी म्हणाले, 'नियोजनाविषयी आपण भाषणे पुष्कळ केलीं; पण आतांपर्यंत फारसें कांहीं साधलेले नाहीं. अनेक दिशांनीं आपण प्रयत्न केले पण केन्द्र व प्रांत यांत आणि प्रांताप्रांतांत अवश्य ते सहकार्य व एकसूत्रता आम्ही आणूं शकलो नाहीं. मी अगदी प्रांजलपणें सांगतों कीं, केन्द्र सरकारमध्येहि अखिल भारताचें समग्र दर्शन घेण्याचा काळजीपूर्वक प्रयत्न केला गेला नाहीं.' (टाइम्स ऑफ इंडिया २६-४-५०)
 आपल्या कार्यक्षमतेचें स्वरूप हे असें आहे. विषयाचे पूर्णज्ञान, पूर्व योजना, काम सुरू झाल्यानंतरची जागरूकता, कार्य तडीस नेऊन इष्ट हेतु सिद्धीस नेण्याची जबाबदारी व तळमळ या सर्व गुणांचा कार्यक्षमतेंत अंतर्भाव होतो. दुर्दैवाने या सर्व गुणांचा आपल्या कारभारांत अभावच दिसून येतो. डॉ. ग्यानचंद यांनी प्रांतविकास योजनांचा जो चित्रपट दिला आहे तसेच इतर खात्यांचे चित्रपट आहेत. आपले सरकारी कायदेपंडित कायदे करतात त्यांचा न्यायालयांत धुरळा होतो. आपले इंजिनियर धरणाच्या भिंती बांधतात त्या पाण्याची लाट त्यांच्यावर थडकण्याच्या आधींच वांकड्या होतात किंवा कोसळून पडतात. त्यांनी बारा वर्षे टिकावयाच्या हिशेबानें बांधलेली घरें सहा महिन्यांत निकामी होतात. गुन्हेगारीला आळा घालण्याचे काम पोलीसांकडे दिले की गुन्ह्यांच्या प्रमाणांत वाढ होण्यास प्रारंभ होतो. अन्नधान्य वाढविण्याची मोहीम सुरू केली की अन्नधान्याचे उत्पादन कमी होऊ लागते. आपले आरोग्यखातें, आपले शिक्षणखाते, आपले नभोवाणीखातें- प्रत्येक ठिकाणी आपल्या कार्यक्षमतेचे डिंडिम असेच वाजत आहेत. भिन्नभिन्न सरकारी खाती व इतर सार्वजनिक संस्था यांचे अहवाल वाचले म्हणजे कर्तृत्वाचा व आपला दहा जन्मांत तरी कधी संबंध आला होता की नाहीं अशी शंका येऊं लागते.